शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:32 AM2021-04-12T04:32:50+5:302021-04-12T04:32:50+5:30
कोरोनामुळे शिक्षण क्षेत्र मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. एक वर्षापासून शाळा व महाविद्यालये बंद आहेत. मागच्या वर्षी १७ मार्च ...
कोरोनामुळे शिक्षण क्षेत्र मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. एक वर्षापासून शाळा व महाविद्यालये बंद आहेत. मागच्या वर्षी १७ मार्च २०२० रोजी जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या.
आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा दोन महिने तर सहावी ते आठवीपर्यंतच्या शाळा केवळ २० दिवस सुरू राहिल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण होऊ शकले नाही. ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाचा फज्जा उडाला.
कधी भारनियमन तर कधी रेंज नसल्याने शिक्षण मिळू शकले नाही. त्यातच शिक्षणमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर पालकांनी रोष व्यक्त केला आहे. ऑनलाईन परीक्षा हा पर्याय होता.
शिक्षण ऑनलाईन दिल्या जात आहे, तर परीक्षाही ऑनलाईन घ्यायला हव्या होत्या. शिष्यवृत्तीच्या परीक्षा घेणे शक्य आहे, तर शाळेच्या का नाही, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
शासनाने कोरोनाची परिस्थिती हाताळताना शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्येत घट आली होती. मृत्यूसंख्याही आटोक्यात होती. मात्र, यावेळी शाळा सुरू करण्यास विलंब करण्यात आला. तसेच प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत, याबाबतही पालकांनी रोष व्यक्त केला आहे.
पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्याना परीक्षा न देता उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी घेतला आहे. अनेकदा कालसापेक्ष निर्णय घ्यावे लागतात. हा निर्णय कुणाच्या मतानुसार नाही तर सध्या उद्भवलेल्या परिस्थितीनुसार घेतला आहे. आगामी काळात परिस्थिती निवळल्यावर शिक्षणाची उणीव भरून काढता येईल. शिक्षण मंत्र्यांनी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देता उत्तीर्ण करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे.
- सदानंद देशमुख,
ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ.
विद्यार्थ्याना परीक्षा न देता उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण हक्क कायद्यानुसार योग्य आहे. शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण दिले आहे. विद्यार्थ्यांना जे शिकविले त्याचे आकलन झाले की नाही, हे पाहण्याकरिता वर्ग ९ आणि ११ च्या प्रत्येक विद्यार्थ्याची ऑनलाईन तोंडी परीक्षा घेता आली असती. ऑनलाईन शिक्षण दिल्याने फायदा होतो की पर्याय शोधायला हवा, हेही कळले असते. नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा घेऊनच त्यांना पुढील वर्गासाठी प्रवेश पात्र ठरविता आले असते. - नरेंद्र लांजेवार,
पालक-बालक समुपदेशक, बुलडाणा
सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेणे धोक्याचे आहे. ऑनलाईन परीक्षा घेताना ग्रामीण भागात अनेक अडचणी येतात. सध्या स्वाध्यायचे शिक्षण देण्यात येत आहे. यादरम्यान अडचणी लक्षात येत आहेत. मोठ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य आहे. मात्र, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा घेणे अवघड आहे.
- अरविंद शिंगाडे, समुपदेशक, जिल्हा शिक्षण व प्रसारक मंडळ.
गत एक वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांचे योग्य शिक्षण झाले नाही. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घ्यायला हव्या होत्या. परीक्षा न घेतल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे बंद केले.
- संजय गवळी, पालक.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे भरून न निघणारे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यातच विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थी अभ्यास करणार नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
- जगन्नाथ शेगोकार,
पालक.
ही ढकलगाडी काय कामाची...
चांगले शिक्षण घेण्याकरिता परीक्षा आवश्यकच आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होते. विद्यार्थी अधिक जोमाने अभ्यास करतात. परीक्षाच झाल्या नाही तर अभ्यासाचे महत्त्वच राहणार नाही.