दहा दिवसांपूर्वी जन्मलेल्या हरिणाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:21 IST2021-07-23T04:21:32+5:302021-07-23T04:21:32+5:30
साखरखेर्डा, गोरेगाव, उमनगाव, पांग्रीकाटे, तांदूळवाडी या भागात हरिणांचे कळप आहेत. मूग, सोयाबीन पीक कोवळे असताना त्यावर मनसोक्त ताव मारतात. ...

दहा दिवसांपूर्वी जन्मलेल्या हरिणाला जीवदान
साखरखेर्डा, गोरेगाव, उमनगाव, पांग्रीकाटे, तांदूळवाडी या भागात हरिणांचे कळप आहेत. मूग, सोयाबीन पीक कोवळे असताना त्यावर मनसोक्त ताव मारतात. संपूर्ण शेतातून हुंदडत जात असताना शेतकरी केवळ आपल्या शेतातून हुसकाविण्याचे काम करतो. दरम्यान, मंगळवारी दुपारी ५ वाजताच्या सुमारास गोरेगाव शिवारातील विजय इंगळे यांच्या शेतात तांदूळवाडी शिवारातून ५० ते ६० हरिणांचा एक कळप आला. साखरखेर्डा ते शेंदुर्जन रोड क्राॅस करीत असताना मोठ्या हरिणाचा कळप रोड पार करून सुसाट वेगाने गोरेगाव, उमनगाव भागाकडे गेला. त्या कळपात १० दिवसांचे हरिण मागे राहिले. पाऊस पडलेला असल्याने त्या पिलाला पळणे कठीण झाले होते. मागे चार-पाच कुत्रे पाठलाग करीत होते. कुत्र्यांच्या तावडीतून वाचायचे असेल तर माणसाचा सहारा घेतल्याशिवाय गत्यंतर नाही, हे ओळखून त्याने विजय इंगळे यांचा सहारा घेतला. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर ते पिलू कळपात जाण्यासाठी पुन्हा धाऊ लागले. दोन किमी धावत जात असताना दबा धरून बसलेले कुत्रे पुन्हा पाठलाग करू लागले. उमनगावचे माजी सरपंच शांताराम गवई यांनी त्या हरिणाच्या पिलाला सांभाळले. त्याला घरी नेऊन बकरीचे दूध पाजले. सकाळी मेहकर विभागाचे वन अधिकारी गवारे यांच्याशी संपर्क साधून त्या पिलाला धनपाल राजेंद्र शेळके, सोपान राठोड, परसराम महाजन यांच्या स्वाधीन केले. त्यांनी पोफळशिवणी जंगलात कळपात नेऊन सोडले.