वॉटर कप स्पर्धेत संग्रामपूर तालुक्यातील ‘सालवन’ प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 17:08 IST2018-08-12T17:06:47+5:302018-08-12T17:08:30+5:30
संग्रामपूर : पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव वॉटर कप स्पर्धेत संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी गाव सालवनचा प्रथम क्रमांक आला असून १० लाखाचे बक्षिस मिळाले आहे.

वॉटर कप स्पर्धेत संग्रामपूर तालुक्यातील ‘सालवन’ प्रथम
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव वॉटर कप स्पर्धेत संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी गाव सालवनचा प्रथम क्रमांक आला असून १० लाखाचे बक्षिस मिळाले आहे. काकोडा गावाचा दुसरा तर रूधाना गावाला तृतीय क्रमांक मिळाला. यामुळे आदिवासी गाव सालवन तसेच संग्रामपूर तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
या स्पर्धेचा निकाल १२ आॅगस्ट रोजी पुणे येथील कार्यक्रमातून जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिने दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, सिने अभिनेता अमिरखान, पत्नी किरण राव, गिरीश कुळकर्णी आदी मान्यवरांच्या हस्ते सालवनचे रेमू डावर यांना प्रथम पुरस्काराचे प्रमाण देण्यात आले. यावेळी गावातील शांताबाई चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होत्या. संग्रामपूर तालुक्यातील १९ गावांनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. तालुक्यात जलसंधारणाची एकूण १०४ कामे विविध गावांत करण्यात आली. कुडामातीचे घर असलेल्या रेमू डावर व राजेश चव्हाण, जागेश कच्छवार, शांताताई चव्हाण व ज्योती भिलावेकर यांनी पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षण घेवून गावातील आदिवासी बांधवांना श्रमदान करण्यास प्रोत्साहीत केले. दररोज येथे ६० ते ७० नागरिक श्रमदान करत होते. विशेष म्हणजे २३ एप्रील रोजी आमिर खान व किरण यांनी सालवन गावाला भेट देऊन गावकºयांसोबत काम केले होते. दरम्यान सालवन गावाला त्यांच्या कष्टाचे फळ मिळाले असून सालवन गावाने प्रथम क्रमांक पटकावला.
(तालुका प्रतिनिधी)