रेती माफीयांना अधिकार्यांचे अभय
By Admin | Updated: July 2, 2014 00:36 IST2014-07-01T22:57:33+5:302014-07-02T00:36:30+5:30
खडकपुर्णा नदीपात्रातून अवैधरित्या रेती उपसा सुरूच असून यासंदर्भात तहसिलदार दखल न घेतल्याने माफियांना त्यांचे अभय असल्याचा आरोप केला आहे.

रेती माफीयांना अधिकार्यांचे अभय
देऊळगावराजा : तालुक्यातील निमगाव गुरू परिसरात खडकपुर्णा नदीपात्रातून अवैधरित्या रेती उपसा सुरूच असून यासंदर्भात तहसिलदार एम.एच.बुटले यांचेकडे वारंवार तक्रारी करूनही दखल न घेतल्याने माफियांना त्यांचे अभय असल्याचा आरोप राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू मोतीराम चित्ते, सरपंच शोभा देविदास चित्ते, देविदास बारिकराव चित्तते यांनी केला आहे.
महसूलमंत्री, जिल्हाधिकारी, आ.डॉ.राजेंद्र शिंगणे, उपविभागीय दंडाधिकारी यांना पाठविलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, खडकपुर्णा नदीपात्रातून हजारो ब्रास रेतीच उपसा माफिया करत असून महसूल विभागाच्या अधिकार्यांचे त्यांना अभय असल्याने शासनाचे नुकसान होत आहे. कारवाई करण्याच्या नावाखाली कर्मचारी एखाद्या वाहनावर दंडात्मक कारवाई करतात. बाकी मर्जीतल्या वाहनांना सूट देवून मोकळे होतात. यापुर्वी तहसिलदार दे.राजा यांच्याकडे तक्रारी करूनही त्यांनी दखल घेतली नाही.
आतापर्यंंत जेवढा रेतीउपसा झाला त्या तुलनेत एक टक्काही दंड वसूल करण्यात आलेलानाही. यासंदर्भात तक्रारीची गंभीरतेने दखल घेवून याप्रकरणी सखोल चौकशी करावी, यामध्ये दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रार कर्त्यांंनी केली आहे.