पावसाची दडी...तुषार सिंचन सुरू झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:24 IST2021-06-24T04:24:01+5:302021-06-24T04:24:01+5:30

चिखली : जून महिना संपत आला असतानाही तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यातील ५८ टक्के हेक्टरवरील पेरण्या रखडल्या ...

Rain showers ... Snow irrigation started | पावसाची दडी...तुषार सिंचन सुरू झाले

पावसाची दडी...तुषार सिंचन सुरू झाले

चिखली : जून महिना संपत आला असतानाही तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यातील ५८ टक्के हेक्टरवरील पेरण्या रखडल्या आहेत. काही भागांत पेरणी योग्य पाऊस झालेला असल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्यात; मात्र, आता पुन्हा पावसाने दडी मारल्याने नुकतेच अंकुरलेली पिके करपू लागली आहेत. पावसाने आणखी विलंब लावल्यास पेरणी झालेल्या ४२ टक्के क्षेत्रावरील पिकांचे ९० टक्के नुकसान अटळ असल्याने सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून तुषार संचाव्दारे पाणी देऊन पिके वाचविण्याची धडपड सुरू झाली आहे.

यामध्ये कोरडवाहू क्षेत्र उद्ध्वस्तीच्या मार्गावर असल्याने सर्वत्र चिंतेचे मळभ दाटून आले आहे. मृगात पेरणी केल्यानंतर पीक चांगले येते, अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. त्यानुषंगाने यंदा मान्सूनपूर्व पाऊस पडताच खरिपाच्या पेरणीसाठी बियाणे व खत खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढली होती. जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे सुमारे ४२ टक्के क्षेत्रावरील शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. मात्र, आता पावसाने डोळे वटारल्याने पेरणी झालेल्या क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. हंगामाच्या सुरुवातीला हमखास पाऊस येणारच असे भाकीत हवामान खात्याच्या व इतर मान्सूनविषयक अभ्यासकांमधून व्यक्त केल्या जात होती. मात्र, ही भाकिते फोल ठरली आहेत. या भाकितांमुळे अनेक शेतकऱ्यांनी गडबड करत सोयाबीनची पेरणी उरकली आहे. ज्या भागात पुरेसा पाऊस झाला व पेरण्या झाल्या, त्या भागास आता पावसाची नितांत गरज आहे. पावसाअभावी नुकतेच अंकुरलेली पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. पेरणीपश्चात पाऊस गायब झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे वाया जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत, त्यांनी तुषार संचाद्वारे सिंचन करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, कोरडवाहू क्षेत्र संकटात सापडले आहे. नव्या आशेची पेरणी केली. मात्र, आता पावसाअभावी हे स्वप्नच करपू लागल्याने शेतकरी पुरता हादरला असून पेरणी झालेल्या व पेरणीसाठी आसुसलेल्या तालुक्यातील एकूण शेतीक्षेत्राला पावसाची नितांत गरज आहे.

३७ हजार १६७ हेक्टरावरील पिके धोक्यात

चिखली तालुक्यात एकूण लागवडीचे क्षेत्र ८८ हजार ४२३ हेक्टर आहे. यापैकी ३७ हजार १६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्यामध्ये २८ हजार ९९५ हेक्टर सोयाबीन, ३ हजार ५२२ हेक्टर तूर, १ हजार ४३६ हेक्टर मूग, १ हजार ८६१ हेक्टर उडीद, १ हजार २०७ हेक्टर कापूस, १२ हेक्टर ज्वारी, ६ हेक्टर बाजरी, ७१ हेक्टर मका, ३५ हेक्टर भूईमूग, २ हेक्टर तीळ व २० हेक्टरावर इतर कडधान्य पिकांची पेरणी झालेली आहे.

५१ हजार २५६ हेक्टरावरील पेरण्या रखडल्यात

अमडापूर, उंद्री आणि एकलारावगळता उर्वरीत ८ मंडळात अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. जून महिन्यातील २३ दिवसांच्या कालावधीत केवळ ७ ते ८ दिवस भाग बदलून पाऊस झाला. एकदाही सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस झालेला नसल्याने अद्यापही तालुक्यातील ५१ हजार २५६ हेक्टरावरील पेरण्या रखडलेल्या आहेत.

Web Title: Rain showers ... Snow irrigation started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.