विजेचा धोका कायमच
By Admin | Updated: June 19, 2015 02:35 IST2015-06-19T02:35:58+5:302015-06-19T02:35:58+5:30
पहिल्याच पावसात बुलडाणा जिल्ह्यातील तिघांचा बळी ; चार वर्षांमध्ये ३४ जीव गमावले.

विजेचा धोका कायमच
खामगाव : यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून तिघांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला, तर मंगळवारी पाच माकडे दगावली. बुलडाणा जिल्ह्यात विजेचा वाढता धोका कायम असून, मागील चार वर्षांत तालुक्यात ३४ जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला. मान्सूनपूर्व पावसाचे जिल्ह्यात ७ जून रोजी आगमन झाले. गेल्या आठवडाभरात पाऊस बर्यापैकी स्थिरावला आहे. या आठ दिवसांत वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये ७ जून रोजी बुलडाणा तालुक्यातील गुम्मी येथील पूजा गणेश नरोटे, ८ जून रोजी सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगाव माळ येथील राधेश्याम जाधव, तर १0 जून रोजी जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील अनिल मैंद यांचा वीज कोसळून मृत्यू झाला. मंगळवारी संग्रामपूर तालुक्यात झाडावर वीज कोसळल्याने पाच माकडे दगावली, तर शेलोडी येथील दोन म्हशी दगावल्या. हा धोका वाढताच असून, पेरणीच्या कामात व्यस्त असलेल्या शेतकर्यांनी विजेपासून धोका पोहोचू नये, याबाबत सुरक्षितता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. *केवळ चार वीजरोधक यंत्रांचा प्रस्ताव वीज कोसळून बळी जाणार्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे . त्या तुलनेत बुलडाण्यात केवळ चार ठिकाणी वीजरोधक यंत्रणा प्रस्तावित आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने २00९ मध्ये शेतकरीहिताचा निर्णय घेऊन राज्यभरात वीजरोधक टॉवर उभारण्याबाबत आदेश दिले होते. यानुसार प्रत्येक जिल्ह्याला दीड कोटींचा निधी मिळाला. नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला तसेच बीड, धुळे, चिपळून, नाशिक जिल्ह्यात ही यंत्रणा टप्याटप्यातून उभारली जात आहे; मात्र बुलडाणा जिल्ह्यात अद्यापही याबाबत पुरेसे नियोजन नसल्याची माहिती नैसर्गिक आपत्ती विभागाकडून मिळाली.
वर्ष जखमी मृत्यू
२0११-१२ ४६ ११
२0१२-१३ २२ 0६
२0१३-१४ ५८ 0५
२0१४-१५ ३९ १२