PM Kissan Scheme : रक्कम परतीच्या नोटिसीला जिल्ह्यातील ५,८७० करदात्या शेतकऱ्यांनी दाखविला ठेंगा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 11:10 IST2021-06-03T11:10:16+5:302021-06-03T11:10:23+5:30
PM Kissan Scheme : जवळपास ६ हजार ७११ करदात्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता.

PM Kissan Scheme : रक्कम परतीच्या नोटिसीला जिल्ह्यातील ५,८७० करदात्या शेतकऱ्यांनी दाखविला ठेंगा?
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : पंतप्रधान किसान योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यांत सहा हजार रुपये देण्यात येतात. मात्र, यामध्ये गेल्या वर्षी काही करदात्या शेतकऱ्यांचाही समावेश असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे अशा करदात्या शेतकऱ्यांना देण्यात आलेली रक्कम परत घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून संबंधितांना नोटीस बजावण्यात आली होती. जवळपास ६ हजार ७११ करदात्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता. त्यांच्यापैकी ५ हजार ८७० शेतकऱ्यांनी अद्याप या नोटिसीला उत्तर दिलेले नाही. त्यामुळे या अशा करदात्या शेतकऱ्यांकडून ही रक्कम घेण्यासाठी जिल्हा प्रशासन सध्या प्रयत्नरत आहे.
गेल्या वर्षी या योजनेसाठी जिल्ह्यातील तीन लाख ८९ हजार शेतकरी पात्र होते. त्यांना हे अनुदान देण्यात आले होते. मात्र, त्यात काही करदात्या शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे निदर्शनास आल्यामुळे पडताळणी केल्यानंतर निव्वळ शेतकरी म्हणून तीन लाख ८२ हजार ६०७ जण असल्याचे समोर आले होते. त्यामुळे उर्वरित ६ हजार ७११ जणांना तहसील कार्यालयामार्फत जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावली होती. त्यापैकी ८४१ शेतकऱ्यांनी त्यांना योजनेंतर्गत मिळालेले ७५ लाख ८६ हजार रुपये परत केले आहेत. अद्यापही ५ हजार ८७० करदात्या शेतकऱ्यांकडून ही रक्कम परत घेणे बाकी आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर सध्या प्रयत्न सुरू आहेत.
आतापर्यंत ७५ लाख ८६ हजार वसूल
जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत ७५ हजार ८६ लाख रुपये अशा करदात्या शेतकऱ्यांकडून वसूल केले आहेत. यामध्ये अनेक जण हे नोकरीवर असून, त्यांच्या नावावर शेती असल्याने त्यांना हा लाभ दिल्या गेला होता. आयकर विभागाच्या तपासणीत ही बाब उघड झाल्याने सार्वत्रिक स्वरूपात अशा करदात्या शेतकऱ्यांकडून देण्यात आलेली अनुषंगिक रक्कम वसूल करण्यास प्रारंभ करण्यात आला होता. जिल्ह्यातील अशा करदात्या शेतकऱ्यांना जवळपास ५ कोटी ८१ लाख ९८ हजार रुपये योजनेंतर्गत देण्यात आले होते. ते आता परत घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी स्पष्ट केले.