निसर्ग हीच जीवनातील संस्काराची पहीली पाठशाळा -  यादव तरटे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 18:03 IST2020-01-18T18:02:59+5:302020-01-18T18:03:08+5:30

अमरावती येथील दिशा वाईल्ड लाईफ फाउंडेशन या संस्थेचे यादव तरटे पाटील यांच्याशी साधलेला संवाद...

Nature is the first school of life's culture - Yadav Tare Patil | निसर्ग हीच जीवनातील संस्काराची पहीली पाठशाळा -  यादव तरटे पाटील

निसर्ग हीच जीवनातील संस्काराची पहीली पाठशाळा -  यादव तरटे पाटील

 - अनिल गवई 
लोकमत न्यूज नेटवर्क
निसर्गाची शाळा ही मुक्त शाळा आहे. जो पाहील तो शिकेलच.  जगायच कसे आणि वागायचे कसे? हे जंगलच माणसाला शिकविते. जंगल हेच जिविका देते. त्यामुळेच निसर्गच मनुष्याचा गुरू आहे, असे आपले प्रामाणिक मत आहे. अमरावती येथील दिशा वाईल्ड लाईफ फाउंडेशन या संस्थेचे यादव तरटे पाटील यांच्याशी साधलेला संवाद...

मानव-वन्यजीव संघर्ष याबाबत आपले मत काय?
मानव वन्यजीव संघर्ष म्हणजे मानवाने स्वत:च्या अस्तित्वाला नामशेष करण्यासाठी स्वत:हून दिलेले आमंत्रण होय. निसर्गाशी असलेली सहजीवनाची मैत्री तोडून आपण त्यापासून दुरावलो. या निर्माण झालेल्या दरीने सहजीवन संपवलं आणि येथून मानव आणि वन्यजीव संघर्ष सुरू झाला. वनतस्करी, वन्यप्राणी शिकार, अतिक्रमण आणि विकास यातून नवा संघर्ष निर्माण झालाय. गत दहा वर्षात भारतात आणि महाराष्ट्रात संघर्षाच्या लाखो घटना घडल्या आहेत. एकीकडे लाखोंच्या संख्येत वन्यप्राणी मरत आहेत तर हजारोंच्या संख्येत मानवाला प्राण गमवावा लागत आहे. 

व्याघ्र केंद्रीत पर्यटनाचा वाघाला त्रास होतोय का?
निश्चितच, व्याघ्रकेंद्रित पर्यटनाचा वाघाला त्रास होतोय. केवळ पर्यटनाच्या नावाखाली चाललेला हा गोरखधंदा अन त्याच अर्थकारण हे अनेक अंगानी वाघाच्याच मुळावर उठलंय हे वास्तव नाकारून चालणार नाही.  अतिपर्यटनामुळे वाघाच्या मानसिक व शारीरिक स्थितीवर काय परिणाम होतोय यावर आपल्या देशात अजून तरी फारसा विचार झालेला नाही.

वन्यजीव आणि पर्यावरण रक्षणासाठी आपले योगदान काय?  
जंगलात केवळ वन्यजीवांमध्ये वाघ, सिंह आणि इतर वन्यप्राणीच नव्हे तर, इतरही भरपूर जैवविविधता आहे. प्राणी, पक्षी, फुलपाखरे व वृक्षसंपदा यांचही एक सुंदर विश्व दडलेलं आहे. ‘दिशा वाईल्ड’लाईफ फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून युवक आणि पर्यावरण रक्षणासाठी झटणाºयांना गत १७ वर्षांपासून अविरत मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाते. तसेच स्थानिक आदिवासी युवकांसाठी स्पर्धा परीक्षाबाबत मोफत मार्गदर्शन केल्या जाते. व्याघ आणि इतर शिकार विरोधी मोहिमेत असलेला सहभाग संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण वाटतो. 

 
पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रात कधीपासून आलात?
बालपणापासूनच पर्यावरण रक्षणासाठी आपला पुढाकार राहीला आहे. वन्यजीवांची आणि त्यांच्या जीवनाची आवड होतीच. मात्र, पदवीनंतर स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उतरल्याने निसर्गाशी मैत्री अधिक घट्ट झाली. यवतमाळ जिल्ह्यातील डोंगराळ भागात असलेल्या शिंदी या खेडेगावात एका शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने जंगल आणि वन्यप्राणी यांचा जवळून संबध आला. गेल्या १७ वर्षांपासून निसर्ग सेवेत कार्यरत आहे. वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनात म्हणजेच स्वसंवर्धनात आपला मुंगीचा वाटा देत असल्याचे मनस्वी समाधान  आहे.
 

Web Title: Nature is the first school of life's culture - Yadav Tare Patil