नांदुरा येथील उड्डाण पुलाचा प्रश्न अधांतरीच!
By Admin | Updated: May 19, 2014 00:45 IST2014-05-19T00:20:15+5:302014-05-19T00:45:37+5:30
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला येथील जळगाव जामोद रोडवरील उड्डानपुलाचा प्रश्न अधांतरीच आहे.

नांदुरा येथील उड्डाण पुलाचा प्रश्न अधांतरीच!
नांदुरा : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला येथील जळगाव जामोद रोडवरील उड्डानपुलाचा प्रश्न अधांतरीच आहे. नागपूर -मुंबई हा रेल्वेमार्ग नांदुरा शहराच्या मध्यवस्तीमधून जातो. शहराच्या एका भागातून दुसर्या भागात जाण्याकरिता रेल्वेमार्ग ओलांडून जावे लागते. रेल्वे अपघात घडू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने जळगाव जामोद रोडवर रेल्वेचे फाटक लावलेले आहे. रेल्वे गाडी आली की, फाटक बंद करण्यात येते व गाडी निघून गेल्यावर फाटक उघडून शहराच्या वाहतुकीसाठी मोकळे करण्यात येते. दिवसेंदिवस शहराचा विस्तार वाढत असल्यामुळे शहराची वाहतूक वाहन संख्या वाढली आहे. दुसरीकडे रेल्वेच्या गाड्यांची संख्या सुध्दा मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रेल्वे फाटक जास्तीत जास्त प्रमाणात बंदच राहते. यामुळे त्या रोडवर असलेली वाहतूक नेहमीच खोळंबलेली राहते. रेल्वे गेटच्या काही अंतरावरच नागपूर मुंबई हायवे आहे. रेल्वे गेट बंद असले की, त्या रोडवर वाहनांची लांबच लांब रांग लागते व ती हायवेवर येते. त्यामुळे अनेक वेळा हायवेची वाहतूक सुध्दा विस्कळीत होते. यामुळे या सर्व वाहतुकीचा शहरातील वाहतुकीवर सुध्दा परिणाम होते. रेल्वे गेटच्या काही अंतरावर पोलिस वसाहत बांधण्यात आली आहे. ठाणेदारासह संपूर्ण पोलिस स्टॉप आज त्या वसाहतमध्ये राहत आहे. पोलिसांना सुध्दा पोलिस स्टेशनमध्ये जाण्यासाठी रेल्वे मार्ग ओलांडून जावे लागते. शहरात एखादी अप्रिय घटना घडल्यास पोलिस घटना स्थळी बंद गेटमुळे वेळेवर पोहचू शकत नाही. एवढेच काय तर या परिसरात किंवा या रोडवर एखादा अपघात झाला किंवा एखादा अपघात झाला किंवा एखाद्याला तातडीने उपचाराची गरज असल्यास त्याला सुध्दा या बंद गेटमुळे वेळेवर उपचार मिळू शकत नाही. यासह इतरही अनेक प्रकारचा त्रास या गेटमुळे होत आहे. रावेर लोकसभा मतदार संघाच्या नवनियुक्त खासदार रक्षा खडसे यांची सासरे विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना सुध्दा या बंद गेटचा त्रास सहन करावा लागला व निवडणूक प्रचार काळात तब्बल विस मिनीट त्यांना बंद गेटसमोर उभे राहून ते उघडण्याची प्रतिक्षा करावी लागली. यावेळी काही स्थानिक नागरीकांच्या आपसातील उड्डानपुलाबाबतच्या चर्चा त्यांच्या कानी पडल्या व त्या त्यांनी नांदुरा येथील एका सभेत सांगितल्या व उपस्थितांना उड्डान पुलाचा प्रश्न मी निकाली काढीन असे आश्वासन दिले. यामुळे शहर वासियांच्या नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसे यांच्याकडून उड्डान पुलाबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.