चांदी उजळून देण्याचे आमिष;दोघांना पकडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:26 IST2017-07-20T00:26:33+5:302017-07-20T00:26:33+5:30
नागरिकांची सतर्कता : ग्रामीण भागात फसवणुकींच्या घटना वाढल्या

चांदी उजळून देण्याचे आमिष;दोघांना पकडले!
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : तांब्या-पितळीची भांडी उजळून देण्याचे सांगत एका महिलेच्या चांदीच्या पाटल्या घेऊन पसार होणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी पकडले. ही घटना बुधवारी दुपारी खिरोडा येथे घडली.
खिरोडा येथील ताईबाई राजाराम गाढे यांच्या घरी दोन भामट्यांनी तांब्या -पितळीची भांडी चमकवून देण्याचे सांगत प्रवेश केला. यावेळी हातातील चांदीच्या पाटल्यादेखील उजळून देण्याचे सांगितले. या पाटल्या घेऊन संबंधितांनी पळ काढला असता, महिलेने आरडाओरड केली. त्यावेळी ग्रामस्थांनी दीपक सिकंदर शर्मा, मनिष नंदलाल यादव या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. उपरोक्त आरोपीविरुद्ध कलम ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी गावातील गोपाल चांदणे, पोलीस पाटील योगेश दाणे, धम्मपाल गाढे, अमोल दाणे, पंंकज ठाकूर या युवकांची समयसुचकता कामात आली. गावातील या युवकांनी समयसुचकता दाखविली नसती, तर महिलेच्या चांदीच्या पाटल्या परत मिळाल्या नसत्या. त्यामुळे युवकांच्या समयसुचकतेचे परिसरात कौतुक होत आहे.