बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा एक महिन्यासाठी लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 10:58 IST2020-07-21T10:57:58+5:302020-07-21T10:58:12+5:30
एक महिन्यासाठी लॉकडाऊन लावण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी सोमवारी केली.

बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा एक महिन्यासाठी लॉकडाऊन
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता सध्या सुरू असलेला १५ दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा एक महिन्यासाठी लॉकडाऊन लावण्याची गरज जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यानुषंगाने २१ जुलै रोजी १५ दिवसांंचा लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा एक महिन्यासाठी लॉकडाऊन लावण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी सोमवारी केली.
शांतता समितीच्या बैठकीत यासंदर्भात उपस्थित असलेल्या समिती सदस्यांचेही यासंदर्भात अभिप्राय जाणून घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून येत्या दोन दिवसात अधिकृतस्तरावर याबाबतचे आदेश निर्गमीत करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा म्हणाल्या.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन हा दुपारी तीन ते दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत आहे. हा कालावधी वाढविण्याची अवश्यकता आहे की तो आणखी कमी करायचा या बाबतही शांतता समितीच्या बैठकीत विचारणा करण्यात आली असता सध्या जी वेळ आहे तीच कायम ठेवण्यात यावी असा सुरू निघाला. मात्र काहींनी वेळ वाढवून मिळावा, अशीही मागणी केली.
दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता आयएमएच्या पदाधिकाऱ्यांचीही पालकमंत्र्यांनी बैठक घेतली असून आवश्यकतेनुसार त्यांची सेवाही प्रशासन घेणार आहे. दरम्यान प्रसंगी संबंधीत डॉक्टरांचे हॉस्पीटलही ताब्यात घेण्यात येतील, असे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बैठकीमध्ये बोलताा स्पष्ट केले. दरम्यान, प्रशासनाने केलेल्या सुचनांचे जर सर्वांनी पालन केले तर कोरोनाला आपण थोपवू शकतो, असे ही डॉ. शिंगणे म्हणाले. दुसरीकडे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी प्रशासकीय पातळीवर योग्य ती खबरदारी घेणण्यात येत असून बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाची चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळेलाही मान्यता देण्यात आली आहे. लवकरच ती कार्यान्वीत होईल, असे डॉ. शिंगणे म्हणाले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वांनी शारीरिक अंतर ठेवणे गरजेचे असून जिल्ह्यात आतापर्यंत २२ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला ही दुर्देवी बाब आहे. त्यामुळे कोरोनाला दुर ठेवण्यासाठी शारीरिक अंतर राखणे हाच खरा रामबाण उपाय असल्याचे शेवटी ते म्हणाले.
शनिवार रविवार पुर्णत: राहणार संचाबंदी
बैठकीत शांतता समितीच्या सदस्यांकडून लॉकडाऊन संदर्भात काही महत्त्वाच्या सुचनाही प्राप्त झाल्या. त्यासोबतच या लॉकडाऊन दरम्यान शनिवार व रविवार असे दोन दिवस संपुर्णत: संचारबंदी राहणार आहे. अर्थात या दोन दिवस कलम १४४ ची गंभीरतेने अंमलबजावणी करण्यात येईल. सोबतच या दोन दिवसात साधा भाजीपालाही विक्री करता येणार नाही, असे सुतोवाच करण्यात आले. जवळपास एक महिन्या्या कालावधीसाठी हा निर्ण लागू राहणार आहे. त्याबाबतचे आदेश लवकरच काढण्यात येतील, असे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा म्हणाल्या. यासोबतच ज्या दिवशी गावांमध्ये आठवडी बाजार असतो. तो ही भरणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता लॉकडाऊन गरणेज गरजेचे असल्याचे प्रशासनाचे मत बनले आहे. गुणात्मक पद्धतीने लागू करण्यासाठी एक स्टॅटेजी ठरवावी लागणार असल्याचेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. दुसरीकडे लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा, शासकीय कार्यालये नियमित व सुरळीतपणे सुरू राहतील, असे यावेळी बोलताना सांगण्यात आले.