श्रद्धेच्या पाहुणचाराने भारावले वारकरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:00 IST2017-07-30T00:00:01+5:302017-07-30T00:00:20+5:30
तब्बल दोन महिन्यांचा प्रवास करून श्रींची पालखी पंढरपूर येथून परतीच्या वाटेने माहेरकडे निघाली आहे. या प्रवासात खामगाव हा श्रींच्या पालखीचा शेवटचा मुक्काम शनिवारी असून, रजतनगरीतील भाविकांनी श्रींच्या पालखीसह सोबत असलेल्या शेकडो वारक-यांना श्रद्धेचा पाहुणचार केला.

श्रद्धेच्या पाहुणचाराने भारावले वारकरी!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: तब्बल दोन महिन्यांचा प्रवास करून श्रींची पालखी पंढरपूर येथून परतीच्या वाटेने माहेरकडे निघाली आहे. या प्रवासात खामगाव हा श्रींच्या पालखीचा शेवटचा मुक्काम शनिवारी असून, रजतनगरीतील भाविकांनी श्रींच्या पालखीसह सोबत असलेल्या शेकडो वारकºयांना श्रद्धेचा पाहुणचार केला. श्रींच्या पालखीचे शहरात विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी, धार्मिक आणि युवक मंडळीच्या वतीने ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.
आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांची पायदळ वारी शेगाव येथून ११ जून रोजी पंढरपूरकडे रवाना झाली होती. आषाढी एकादशीचा सोहळा आटोपून तब्बल दोन महिन्यांचा प्रवास करीत पालखी परतीच्या मार्गावर आहे. रजतनगरीत शनिवारी सकाळी अश्व, ध्वज व वारकरी बंधूंसह हरिनामाच्या जयघोषात व टाळ, मृदृंगाच्या गजरात श्रींच्या पालखीचे आगमन झाले. खामगाव बायपास रोडवरील हनुमान व्हिटामीन येथे पालखीचे आगमन होऊन येथे वारकºयांना सकाळचे भोजन देण्यात आले. काल्याचे कीर्तन होऊन श्रींची आरती झाली. यानंतर पालखी नगर परिक्रमासाठी निघाली. बाळापूर फैल, भुसावळ चौक, सरकी लाइन, मेन रोड, महावीर चौक, मित्र समाज छापखाना, शहर पोलीस स्टेशन रोड, नांदुरा रोडवरील टॉवर चौक, सिव्हिल लाइन, देशमुख प्लॉट, एकबोटे चौक, मेन रोड, फरशी येथून श्री संत गजानन महाराज मंदिर सुटाळपुरा येथे पोहचली.
वारक-यांसाठी प्रसादाचे वाटप
पायी दिंडीत सहभागी असणाºया वारकºयांसाठी ठिकठिकाणी भक्तांच्या वतीने चहा, दूध, केळी, फराळी चिवडा, शरबत, पाणी पाऊच, नारळ पाणी, वेफर्सचे पाकीट, जेवणाची भांडी ताट व ग्लास, पेढे, चिक्की, लाडू तसेच शिरा-पुरीचे जेवण देण्यात आले.
शहा यांची श्रींच्या पालखीसोबत वारी
शेगाव येथील रिक्षाचालक मेहबूब शहा सलग पाचव्या वर्षी लोणार ते शेगाव पायदळ वारी करीत असून, त्यांना गजानन विजय ग्रंथातील अनेक ओव्या मुखोद्गत आहेत. त्यामुळे सातासमुद्रापार पोहचलेल्या श्रींच्या भक्तीला आता धर्माचेही बंधन उरलेले नसल्याची प्रचिती येत आहे. श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर असून, शनिवार २९ जुलै रोजी पालखीचे खामगावात आगमन झाले. सदर पालखीमध्ये शेगाव येथील कविमनाचे रिक्षाचालक मेहबूब शहा यांचाही सहभाग दिसून आाला. त्यामुळे प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला असता मेहबूब शहा यांनी श्रींच्याविषयी त्यांच्या मनातील भक्तिभाव कथन केला. शेगाव रेल्वेस्टेशनवर रिक्षाचालक असणारे मेहबूब शहा हे भाविकांना संत गजानन महाराज मंदिर येथे पोहचून देण्याचे काम करतात. त्यामुळे ते स्वत:ला श्री संत गजानन महाराज व भाविकांमधील दुवा असल्याचे सांगतात. संत गजानन महाराजांविषयी श्रद्धा कशी काय निर्माण झाली, याबद्दल विचारणा केली असता मेहबूब शहा म्हणाले की, माझ्या आई-वडिलांनी गजानन महाराज हे अवलिया असल्याचे सांगितल्यापासूनच माझ्या मनात त्यांच्याविषयी भक्तिभाव रुजू झाला व तो उत्तरोत्तर वाढत गेला. सन २०१३ पासून आपण लोणार ते शेगाव पायदळ वारी गजानन महाराजांच्या पालखीसोबत करीत आहोत, असे सांगून त्यांनी गजानन विजय ग्रंथातील काही ओव्याही म्हणून दाखविल्या.