कर्जमाफीचे अर्ज भरणे अशक्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:06 IST2017-07-31T01:06:31+5:302017-07-31T01:06:31+5:30

कर्जमाफीचे अर्ज भरणे अशक्य!
सुहास वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा: महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’ अंतर्गत कर्जमाफीसाठी ग्रा.पं. अंतर्गत असलेल्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्राच्या माध्यमातून अर्ज सादर करण्याचे आदेश शासनाने दिले; मात्र प्रत्यक्षात ग्रा.पं. मधील सेवा केंद्रामध्ये नेट कनेक्टिव्हिटी नाही. तर काही केंद्रात केंद्र चालक नाहीत. अशा विविध समस्यांमुळे बहुतांश ग्रा.पं. मधून कर्जमाफीचे अर्र्ज भरणे अशक्य झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीच्या लाभासाठी ग्रा.पं. स्तरावून चालविण्यात येणाºया आपले सरकार सेवा केंद्रातून अर्ज पाठविण्याचे आदेश देण्यात आले; मात्र प्रत्यक्षात ग्रामपंचायतींना २०१३ मध्ये सुमारे ४ वर्षांपूर्वी संगणक मिळाले आहेत. त्याकरिता संगणक परिचालकांची नियुक्ती झाली आहे; मात्र प्रत्यक्षात आज रोजी अनेक ग्रा.पं.मध्ये ते संगणक व प्रिंटर धूळ खात पडून आहेत. काही ग्रा.पं.मध्ये ते सुरू आहेत. तर सध्याच्या सॉफ्टवेअरच्या तुलनेत ते कालबाह्य झाले आहेत. ग्रा.पं.मध्ये ब्रॉडबॅन्ड नाही.
काही ग्रा.पं.चा आॅनलाइन कारभार ग्रा.पं.च्या मिळणाºया ‘टू’ जी सेवेवर कसाबसा सुरू आहे. आजही जिल्ह्यातील काही ग्रा.पं.मध्ये आपले सरकार केंद्र संचालकांची नियुक्ती झाली नाही. त्यामुळे या केंद्रातून कर्जमाफीचा अर्ज भरणे अशक्य झाले आहे. तर जिल्ह्यातील बहुतांश आपले सरकार केंद्र अद्याप सुरूच झालेले नाहीत. त्यामुळे ग्रा.पं. स्तरावरून सदर कर्जमाफीचे अर्ज पाठविणे अशक्य झाले आहे.
‘शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामसेवक व केंद्रचालक सदर अर्ज भरण्यासाठी पुढाकार घेऊन कार्यरत आहेत; मात्र नेट कनेक्टिव्हिटी नसल्याने तसेच प्रिंटर नादुरुस्त झाल्याने या केंद्राच्या माध्यमातून सदर काम करणे अशक्य झाले आहे.
- प्रशांत जामोद
राज्य सरचिटणीस, ग्रामसेवक युनियन