नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या १६0 रुग्णांचा लागला शोध!
By Admin | Updated: December 7, 2015 02:41 IST2015-12-07T02:41:45+5:302015-12-07T02:41:45+5:30
नेत्र शस्त्रक्रियेतून रुग्णांमध्ये उद्भवले होते नेत्रदोष; वाशिम सामान्य रूग्णालयाची शोधमोहीम.

नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या १६0 रुग्णांचा लागला शोध!
सुनील काकडे / वाशिम : वाशिम जिल्हा सामान्य रूग्णालयात नेत्र शस्त्रक्रीया झाल्यानंतर आठ रूग्णांना दृष्टी गमवावी लागण्याच्या पार्श्वभूमिवर आरोग्य यंत्रणेने ऑक्टोबर २0१५ मध्ये ज्यांच्यावर नेत्र शस्त्रक्रिया झाल्या, त्या रुग्णांचा शोध घेऊन पुन्हा तपासणी करण्याचे ह्यफर्मानह्ण शासनाने सोडले होते. त्याअनुषंगाने वाशिम जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या संपूर्ण यंत्रणेने शोध मोहीम राबवून आतापर्यंत शस्त्रक्रिया झालेल्या १६0 रुग्णांचा आतापर्यंत शोध घेतला. १३ रुग्णांच्या डोळ्यांमध्ये काही अंशी दृष्टिदोष असल्याने त्यांना मुंबईच्या जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ पाठविण्यात आले होते. उर्वरित रुग्णांचे डोळे सुस्थितीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात १५ ऑक्टोबर रोजी आयोजित एका शिबिरात २२ पेक्षा जास्त रुग्णांवर नेत्ररोग तज्ज्ञांमार्फत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली होती; मात्र ही शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे आठ रुग्णांना डोळे गमवावे लागले. १५ ऑक्टोबर रोजी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना दुसर्याच दिवशी घरी पाठविण्यात आले. त्यानंतर डोळ्यात जळजळ होत असल्यामुळे रुग्ण रुग्णालयात परत आले. त्यावेळी शस्त्रक्रियेमध्ये दोष असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी रुग्णांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयामध्ये पाठविले होते. यामध्ये काही रुग्णांना दृष्टी गमवावी लागण्याचा धोका दिसून असल्याने रुग्णांना जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आले. चुकीच्या पद्धतीने नेत्र शस्त्रक्रिया व जंतुसंसर्ग झाल्यानंतरही योग्य उपचार न केल्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मुंढे व नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत चव्हाण यांना ४ नोव्हेंबर रोजी निलंबित करण्यात आले होते.
ऑक्टोबर २0१५ या महिन्यात जेवढय़ा लोकांवर नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या, त्यांचा शोध घेऊन पुन्हा त्यांची नेत्र तपासणी करण्याचे फर्मान शासनाने सोडले होते. त्यानुसार, वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील शालेय आरोग्य तपासणी उपक्रमातील चमूसह इतर कर्मचार्यांचे पथक नेमून त्यांना विविध गावांमध्ये पाठविण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्र शस्त्रक्रिया करण्यापूर्वी संबंधित रुग्णांनी नोंदविलेल्या पत्त्यांच्या आधारे कर्मचार्यांनी घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध घेतला. १७२ पैकी आतापर्यंत १६0 रुग्णांचा शोध घेण्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाला यश मिळाले असून, त्यापैकी १३ रुग्णांना काही अंशी दृष्टिदोष असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता जे.जे. हॉस्पिटलला रवाना करण्यात आले होते. उर्वरित रुग्णांची शोधमोहीम अद्यापही सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी 'लोकमत'ला दिली.