श्री व्यंकटेश महाविद्यालयामध्ये पदवी प्रमाणपत्र वितरण समारोह उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:38 IST2021-08-28T04:38:18+5:302021-08-28T04:38:18+5:30
या कार्यक्रमासाठी बी.ए., बी.कॉम., बी.एससी. या तीनही विद्याशाखांतून पाच-पाच विद्यार्थी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी ...

श्री व्यंकटेश महाविद्यालयामध्ये पदवी प्रमाणपत्र वितरण समारोह उत्साहात
या कार्यक्रमासाठी बी.ए., बी.कॉम., बी.एससी. या तीनही विद्याशाखांतून पाच-पाच विद्यार्थी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. पदवी प्रमाणपत्रे वितरणानंतर प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक सातव यांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करायला हवे व अथक प्रयत्न करायला हवे. यामुळे कोणत्याही क्षेत्रात यश संपादन केले जाऊ शकते. कला, वाणिज्य शाखांतून पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात करिअर घडवावे. विज्ञान शाखेतील पदवीधरांना असंख्य क्षेत्रांत संधी उपलब्ध आहेत. सर्व विद्यार्थिनींनी आपल्या पालकांकडे उच्च शिक्षणासाठी आग्रह धरावा. सर्व पदवीधरांनी मोबाइल व सोशल मीडियाचा वापर अभ्यास व ज्ञानवाढीसाठी करावा, असे मत सातव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी सर्वप्रथम पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले. कला शाखेत अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, विज्ञान शाखेत रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र या विषयांत पदव्युत्तर पदवी तसेच ग्रंथालयशास्त्र विषयात पदवी अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे सांगितले. पारंपरिक अभ्यासक्रमांसोबतच व्यावसायिक अभ्यासक्रमांवर भर देणार असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी पदवीनंतर केवळ नोकरीच्या मागे न लागता करिअरच्या इतर संधी शोधणे गरजेचे आहे. आपल्यातील कौशल्य ओळखून आधुनिक पद्धतीने शेती, व्यवसाय व रोजगार यामध्ये आपले करिअर करणे आवश्यक आहे. क्षमता असणा-यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. तसेच काॅर्पोरेट क्षेत्रातील संधी ओळखून स्टार्टअपच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक बनावे, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला. श्री बालाजी महाराज संस्थान व हे महाविद्यालय तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी नेहमीच मदत करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश अर्थात कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सोपान चव्हाण यांनी केले व आभारप्रदर्शन प्रा. रवींद्र गणबस यांनी केले.