मृग नक्षत्र कोरडे गेल्याने पेरण्या खोळंबल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2016 00:07 IST2016-06-22T00:07:01+5:302016-06-22T00:07:01+5:30
शेतकरी चिंतातुर; वरुणराजाचा रुसवा कायम.

मृग नक्षत्र कोरडे गेल्याने पेरण्या खोळंबल्या!
मोताळा (जि. बुलडाणा): मृग नक्षत्रात हमखास पडणार्या पावसाने यावर्षीही पाठ फिरविल्याने तालुक्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. नक्षत्र कोरडे गेल्याने २२ जूनपासून सुरू होणार्या आद्र्रातही दमदार आणि पेरणीलायक पाऊस येतो की नाही, याची चिंता आता शेतकर्यांना सतावत आहे. तालुक्यात एकूण ५७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होऊ घातली असून, बहुतांश शेती निसर्गाच्या पावसावर अवलंबून आहे. रोहिणी नक्षत्रानंतर मृगाचा प्रारंभी एखादा दमदार पाऊस झाला की शेतकरी तिफणीवर मूठ धरतात आणि मृगाच्या दुसर्या चरणात जवळपास सर्व पेरण्या आटोपलेल्या असतात; मात्र यंदाही पावसाने वेळवर दगा दिला. मागील दोन वर्षांपासूनच्या अवर्षणग्रस्त परिस्थितीत हतबल न होता शेतकरी वर्गाने नियोजन करून आपली फरपट थांबवण्याचा प्रयत्न केला. पावसाच्या भरवशावर हंगामी व पूर्व हंगामाची सोय असलेल्या अनेक शेतकर्यांनी कपाशी, तूर, सोयाबीन, मका पिकाची लागवड केलेली आहे; मात्र आणखी काही दिवस पावसाने ताण दिल्यास अशा शेतकर्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते. शेतकरी वर्ग शेती मशागतीची कामे आटोपून पेरणीसाठी सज्ज आहे. बी-बियाणे, खते घेऊन ठेवले आहेत. कधी एकदाचा वरुणराजा बरसतो, याची आस लागून आहे. कधी काळी धूळ पेरणीला मोताळा तालुका अग्रेसर असायचा; मात्र मागील पावसाचा लहरीपणा पाहता धूळ पेरणीस यावर्षीही शेतकरी धजावला नाही. सिंचनाची सोय असलेल्या अनेक शेतकर्यांनी मृगाच्या भरवशावर कपशीची लागवड करून ठेवली आहे; मात्र मृग कोरडा गेल्याने या शेतकर्यांचीही चिंता वाढली आहे. परिणामी पावसाअभावी पेरण्या लटकल्या असून, मूग, उडीद, तूर, तीळ, मिरची, मका, सोयाबीन आदी नगदी पिकांची बियाणे घरातच पडून आहेत. जुलै महिन्यापासून नगदी पिकांची तोडणी सुरू होते. त्यासाठी ७ ते १0 जूनपर्यंत या पिकांची पेरणी झाली पाहिजे; मात्र पावसाअभावी नगदी व ठोक पिकांची बियाणे घरातच पडून असल्यामुळे शेतकर्यांसह सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.