सीमावर्ती भागात नाकेबंदी
By Admin | Updated: June 26, 2015 01:32 IST2015-06-26T01:32:01+5:302015-06-26T01:32:01+5:30
राज्यात केवळ गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३० जून आणि ४ जुलै रोजी मतदान होणार आहे.

सीमावर्ती भागात नाकेबंदी
जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी : निवडणूकसंबंधी आंतरराज्य सीमा बैठक
गोंदिया : राज्यात केवळ गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३० जून आणि ४ जुलै रोजी मतदान होणार आहे. दोन्ही जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया सुरक्षित व शांततेत पार पाडण्यासाठी या जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आंररराज्य नाकेबंदी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषद निवडणुकीबाबत आंतरराज्य सीमा बैठक पार पडली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी बोलत होते.
बैठकीला भंडारा जिल्हाधिकारी धीरजकुमार, पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना, राजनांदगावचे (छत्तीसगड) अप्पर जिल्हाधिकारी के.आर. उगले, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, बालाघाटचे (मध्य प्रदेश) अप्पर पोलीस अधीक्षक नीरज सोनी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, राजनांदगावचे (छत्तीसगड) अप्पर पोलीस अधीक्षक वाय.पी. सिंग, भंडारा अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक, लांजीचे (मध्य प्रदेश) उपविभागीय पोलीस अधिकारी जी.एस. वर्धमान आणि कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांढरकर व उपजिल्हा निवडणूक अधिकारी उमेश काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, निवडणुकीच्या काळात गोंदिया व भंडारा जिल्ह्यात मध्य प्रदेश, छत्तीसगड व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेतून प्रवेश करणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करावी. बालाघाट व राजनांदगावच्या सीमावर्ती भागात विशेष लक्ष द्यावे. सीमावर्ती भागातून जिल्ह्यात मद्य पुरवठा होणार नाही, याची काळजी घ्यावी. २९ व ३० जूनला गोंदिया जिल्ह्यात, ३ व ४ जुलैला भंडारा जिल्ह्यात मतदान व ६ जुलै रोजी दोन्ही जिल्ह्यात मतमोजणी होणार आहे. त्यामुळे परवानाधारक मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार असल्यामुळे या दिवशी मद्यविक्री होणार नाही. तसेच चोरट्या मार्गाने दारू येणार नाही याची दक्षता घ्यावी.
मतदानासाठी मतदारांना कुणी पैसे व दारुचे आमिष दाखवित असेल तर संबंधितांची माहिती द्यावी असे सांगून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, मतदानाच्या वेळी कुणीही बोगस मतदान करणार नाही याकडे विशेष लक्ष असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी धीरजकुमार म्हणाले, दोन्ही जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात असावा. नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्राकडे पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
राजनांदगाव, बालाघाट आणि गडचिरोली जिल्ह्यातून बैठकीला आलेल्या महसूल व पोलीस अधिकाऱ्यांनीदेखील निवडणूकीच्या काळात सीमावर्ती भागात आवश्यक त्या उपाययोजना करणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)