जनावरे दगावलीत, आता पुराने वेढले
By Admin | Updated: August 31, 2014 23:53 IST2014-08-31T23:35:31+5:302014-08-31T23:53:09+5:30
खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावातील पाच घरे वाहुन गेलीत, शेतजमीन खरडल्यात.

जनावरे दगावलीत, आता पुराने वेढले
बळीराम वानखडे / खामगाव
तालुक्यातील हिवरखेड या गावात नैसर्गिक संकटाने चांगलीच दहशत पसरविली आहे. या गावातील शेकडो जनावरे दगावल्याच्या वृत्ताची शाई वाळत नाही तोच, आज पुन्हा गावात पावसाचा कहर झाला. पहाटे झालेल्या अतवृष्टीमुळे गावातील नदीला पूर आल्याने गावातील पाच घरे वाहून गेली. त्याचप्रमाणे अनेक शेतकर्यांची शेती खरडून गेली.
जुलै महिन्याच्या अखेरीस अचानक आलेल्या अतवृष्टीमुळे या गावातील पशु पालकांची १६५ जनावरे मृत्यूमुखी पडली होती. गावातील तानाजी शिंगाडे या एकाच शेतकर्यांची ६0 जनावरे दगावली होती. त्याचप्रमाणे गोपाल हटकर यांच्याही २२ जनावरांचा मृत्यू झाला होता. या धक्क्यातून गावातील नागरिक कसेबसे सावरले असतानाच, आज पुन्हा अतवृष्टीने कहर केला. परिसरात झालेल्या अतवृष्टीमुळे गावातून जाणार्या नाल्याला पूर आला. या पुरात लक्ष्मण अशोक अडागळे, अजय अशोक अडागळे, गोपाल हरी अडागळे, सुखदेव नामदेव अडागळे, निमाबाई भगत या नागरिकांची घरे वाहून गेली. निमाबाई भगत या विधवा महिलेच्या घरी तिची डिलेव्हरी झालेली मुलगी एकटीच असताना, घराला पुराने वेढा घातला. या महिलेची कशीबशी सुटका करून गावकर्यांनी तिला चिमुकल्यासह ग्रामपंचायत कार्यालयातील एका खोलीत आसरा दिला. लक्ष्मण अडागळे यांच्या घरातील चार हजार रूपये रक्कमेसह संपूर्ण भांडीकुंडीही पुरात वाहून गेली आहे. घर वाहून गेल्याने या कुंटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. नदीला पहाटे पूर आल्याने कोणतीही जिवित हानी झाली नसली तरी मोठय़ाप्रमाणात वित्तहानी झाली आहे. त्याचप्रमाणे गोपाल हटकर, तानाजी शिंगाडे, अशोक हटकर, पंढरी राऊत, निंबाजी शिंगाडे, महादेव खंडारे यांच्यासह अनेक शेतकर्यांची शेती खरडून गेली. गोपाल हटकर यांच्या रस्त्यावरील शेतातील कपाशीसोबतच सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे तानाजी शिंगाडे या युवा शेतकर्याच्या बागायती शेतातील संत्र्याची व डाळींबाची झाडे वाहून गेली आहेत. पंढरी राऊत यांच्या शेतातील नाशिक कांद्यासह दीड एकर कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे.
*तांत्रिक आधार नसलेली पध्दत अडचणीची
खामगाव तालुक्यातील पर्जन्यमान मोजण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका बिल्डींगवर आकाशातून पडणार्या पाण्याची साठवणूक करणारे यंत्र बसविण्यात आले आहे. या यंत्रात पाणी साचल्यानंतर बाजार समितीतील कोणताही एक कर्मचारी ते पाणी काचेच्या नळीत टाकतो. या नळीत मोजमाप केल्यानंतर पाण्याची आकडेवारी ठरविण्यात येते. पर्जन्यमापक यंत्र नसलेल्या परिसरात पाऊस झाल्यास याची नोंद इथे होत नाही. थोडक्यात या इमारतीच्या परिसरात पडणारा पाऊस म्हणजेच तालुक्यातील पावसाची सरासरी ठरविण्यात येते. त्यामुळे कोणताही तांत्रिक आधार नसलेली ही पद्धत परिसरातील नागरिकांच्या मुळावर उठली आहे. शिरसगाव देशमुख, अंत्रज, गोंधनापूर, वाघळी, गारडगाव, हिवरखेड परिसरात अतवृष्टी झाल्यानंतरही शहरात केवळ १६ मिमी पावसाची नोंद झाली होती. हीच आकडेवारी शासकीय आकडेवारी ठरत आहे.