कृषी केंद्रांवर नियमांना खो!
By Admin | Updated: June 21, 2016 23:28 IST2016-06-21T23:28:10+5:302016-06-21T23:28:10+5:30
कृषी विभागाचे दुर्लक्ष; बियाण्यांच्या उगवणशक्तीची शेतक-यांना शाश्वती नाही!

कृषी केंद्रांवर नियमांना खो!
बुलडाणा: शेतकर्यांना आवश्यक असलेल्या रासायनिक खताचा तुटवडा सांगून, त्यांच्या मस्तकी दुसरेच खत मारले जाते. खरेदी केलेल्या बियाण्याचे पक्के बिल शेतकर्यांना दिले जात नाही. बहुतांश कृषिसेवा केंद्रावर संगणक प्रणाली नाही, शिवाय दुकानात लावलेल्या फलकांवरील बियाणे प्रत्यक्षात उपलब्ध नसण्यासारख्या अनेक समस्यांचा शेतकर्यांना सामना करावा लागत आहे. याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष असल्याने, कृषी सेवा केंद्रावर खते-बियाणे विक्रीसंदर्भातील नियमांना खो बसत आहे.
जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी खत, बियाणे खरेदी करण्याकरिता कृषी सेवा केंद्रांवर गर्दी करीत आहेत. शेतकर्यांकडून अचानक खत-बियाण्याची मागणी वाढल्याने कृषी सेवा केंद्रावर शेतकर्यांची आर्थिक लूट केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ह्यलोकमतह्णने शहरातील १५ दुकानांची प्रत्यक्ष पाहणी केली. यादरम्यान लोकमत चमूने तेथे हतेडी, साखळी बु., कोलवड, पांगरी, तांदुळवाडी, नांद्रा कोळी येथून खत, बियाणे खरेदीसाठी आलेल्या शेतकर्यांशी संवाद साधला असता, हे चित्र स्पष्ट झाले. बर्याच दुकांनामध्ये बिलिंग करण्यासाठी संगणक प्रणाली आढळून आली नाही, शिवाय बी-बियाणे, खत नोंदणीचे रेकॉर्ड संगणकाऐवजी साध्या वहीत ठेवण्यात आल्याचे आढळून आले. शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करून दुकानाबाहेर बी-बियाणे, खत आदीची दरफलक लावण्यात आले होते; मात्र त्यावर दर्शविलेले बियाणे प्रत्यक्षात दुकानात नसल्याचे तेथे उपस्थित शेतकर्यांनी लोकमत चमूला सांगितले.