पीक विम्यात आधार कार्डचा खोळंबा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:10 IST2017-08-02T02:10:08+5:302017-08-02T02:10:48+5:30

बुलडाणा : शेतमालाचा पीक विमा काढण्याकरिता शेतकर्‍यांना आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे; मात्र आधार कार्ड नसल्यामुळे अनेक शेतकरी पीक विम्यापासून काढण्यापासून वंचित राहत आहेत. गतवर्षी तब्बल तीन लाख ६३ हजार शेतकर्‍यांनी पीक विमा  काढला होता, तर यावेळी आतापर्यंंत केवळ ५८ हजार शेतकर्‍यांनीच पीक विमा  काढला आहे. 

Aadhaar card for the crop insurance! | पीक विम्यात आधार कार्डचा खोळंबा! 

पीक विम्यात आधार कार्डचा खोळंबा! 

ठळक मुद्देजिल्हय़ात आतापर्यंंत ५८ हजार शेतकर्‍यांनीच काढला विमा 58000 शेतकर्‍यांनी काढला विमा 35000 शेतकर्‍यांचा ऑफलाइन विमा24000 पीक कर्ज घेतलेले शेतकरी

विवेक चांदूरकर। 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शेतमालाचा पीक विमा काढण्याकरिता शेतकर्‍यांना आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे; मात्र आधार कार्ड नसल्यामुळे अनेक शेतकरी पीक विम्यापासून काढण्यापासून वंचित राहत आहेत. गतवर्षी तब्बल तीन लाख ६३ हजार शेतकर्‍यांनी पीक विमा  काढला होता, तर यावेळी आतापर्यंंत केवळ ५८ हजार शेतकर्‍यांनीच पीक विमा  काढला आहे. 
शासनाच्यावतीने पीक विमा  ऑनलाइन काढण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र यामध्ये अनेक अडचणी आल्याने शेतकरी पीक विमा  काढू शकले नाहीत. शासनाच्या ही बाब लक्षात येताच पीक विमा  ऑफलाइन काढण्याचा निर्णय २८ जुलै रोजी घेण्यात आला; मात्र विमा काढण्याची अंतिम मुदत ३१ जुलै असल्याने शेतकरी यापासून वंचित राहले. त्यामुळे शासनाने ५ ऑगस्टपर्यंंत मुदत वाढ दिली आहे. शासनाने मुदतवाढ दिली असली, तरी पीक विमा  काढण्यात अनेक अडचणी येत आहेत. यावर्षी विमा काढण्याकरिता आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. आधार कार्ड नसले, तर आधार कार्ड काढण्याकरिता दिल्यानंतर मिळत असलेली पावती आवश्यक आहे; मात्र आधार कार्ड अनिवार्य असल्याची माहिती शेतकर्‍यांना आधी देण्यात आली नाही. ऐनवेळी माहिती मिळाल्यामुळे अनेक शेतकर्‍यांकडे आधार कार्ड नव्हते, त्यामुळे शेतकरी पीक विमा  काढू शकले नाहीत. सध्या ऑफलाइन पीक विमा  काढण्यात येत असला, तरी आधार कार्ड मागण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी पीक विमा  काढण्याचा अर्ज भरला; मात्र त्यांचे आधार कार्ड लिंक झाले नाही, तर रक्कम स्वीकारल्या जाणार नाही.   
जिल्ह्यात गतवर्षी तब्बल ३ लाख ६३ हजार शेतकर्‍यांनी पीक विमा  काढला होता, तर यावर्षी ३१ जुलैपर्यंंत केवळ ५८ हजार शेतकर्‍यांनीच विमा काढला आहे. यामध्ये २४ हजार शेतकरी पीक कर्ज घेतलेले आहेत, तर केवळ ३५ हजार शेतकर्‍यांनीच विमा काढला आहे. त्यामुळे यावर्षी पीक विमा  काढणार्‍या शेतकर्‍यांचे प्रमाण अल्प आहे.
     जिल्ह्यात ५ लाख ८८ हजार शेतकरी आहेत.  यापैकी केवळ ५८ हजार शेतकर्‍यांनी पीक विमा  काढला असून,  आधार कार्डच्या अडचणीमुळे जिल्ह्यातील शेतकरी पीक विमा  काढण्यापासून वंचित राहत आहेत. 

नुकसानभरपाई न मिळाल्याने शेतकर्‍यांची उदासीनता 
गतवर्षी मोठय़ा प्रमाणात शेतकर्‍यांनी पीक विमा काढला होता; मात्र शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. गतवर्षी जिल्ह्यात कपाशीचे उत्पन्न चांगले झाल्याचा अहवाल देण्यात आल्याने एकाही कपाशी उत्पादक शेतकर्‍यांना पीक विमा मिळाला नाही, तसेच अन्य शेतकर्‍यांनाही विका मिळाला नसल्याने शेतकर्‍यांनी यावर्षी याकडे पाठ फिरविली आहे. 

बँकांचा कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांचे पैसे भरण्याकडे कानाडोळा 
पीक कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांच्या पिकांचा विमा बँकांच्यावतीने काढण्यात येतो. जिल्ह्यात ३२ हजार शेतकर्‍यांनी गतवर्षीचे कर्ज भरून नवीन पीक कर्ज घेतले आहे; मात्र कर्ज घेतलेल्या २४  हजार शेतकर्‍यांचाच विमा बँकांनी काढला आहे. या शेतकर्‍यांकडे आधार कार्ड नसल्याचे कारण बँकेच्यावतीने देण्यात आले आहे. पीक विम्याचे पैसे मिळाल्यानंतर शेतकरी सदर पैसे कर्जाच्या रकमेत वर्ग करण्याला विरोध करतात. त्यामुळे बँकांच्यावतीने यावर्षी कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांचा विमा काढण्याकडे कानाडोळा करण्यात आला.

मुदतवाढीचा बँकांना आदेशच नाही?
पीक विमा काढण्याची अंतिम मुदत ३१ जुलै होती; मात्र शासनाने यामध्ये वाढ करून ५ ऑगस्टपर्यंंत मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढ मिळाल्याचे वृत्त विविध वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झाले. त्यामुळे १ ऑगस्ट रोजी अनेक शेतकरी बँकांमध्ये पीक विमा काढण्याकरिता गेले; मात्र यावेळी जिल्ह्यातील काही ठिकाणी बँकेच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना पीक विमा काढण्याच्या मुदतवाढीचा आदेश अजूनपर्यंंत आमच्याकडे आलाच नसल्याचे कारण सांगत परत पाठविले. त्यामुळे शेतकर्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागला. अनेक शेतकरी गावातून पैसे खर्च करून बँकेत गेले; मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली.  
 

Web Title: Aadhaar card for the crop insurance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.