जलस्त्रोतांना २५ कोटींची संजीवनी
By Admin | Updated: May 25, 2014 00:06 IST2014-05-25T00:02:04+5:302014-05-25T00:06:20+5:30
पाझर तलाव, गाव तलाव, नाला बांधाची दुरुस्तीसाठी प्रत्येक तालुक्यास 0६.९४ लक्ष रुपये

जलस्त्रोतांना २५ कोटींची संजीवनी
मेहकर: जलसंधारण विभागाने महात्मा ज्योतिबा फुले जल भूमी संधारण अभियानासाठी २५ कोटींचे अनुदान दिले आहे. हे अभियान प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच ग्रामीण भागातील जनतेच्या लोकसहभागाद्वारे राबविण्यात येत आहे. २0१४-१५ मध्ये या अभियानास राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून २५ कोटी रुपये अनुदान २२ मे रोजी मंजुर करण्यात आले आहे. या अनुदानातून जलसंधारण विभाग, जिल्हा परिषदेच्या विविध योजनातून बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला व माती नाला बांध, पाझर तलाव, गाव तलाव पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. तालुक्यातून सात जलस्त्रोत दुरूस्ती करण्यासाठी प्रत्येक तालुक्यास 0६.९४ लक्ष रुपये प्रमाणे ३३ जिलतील ३५३ तालुक्यास २४४९.८२ लक्ष रुपये अनुदान आणि प्रचार प्रसिद्धीसाठी ५0.१८ लक्ष रुपये असे एकूण २५ कोटी रुपये अनुदानास मंजुरी देण्यात आली आहे. या अनुदानामुळे कुपोषित असलेल्या जलस्त्रोतांना बळकटी मिळणार आहे.