बुलडाणा जिल्ह्यातील २0 गावांना पुराचा धोका!
By Admin | Updated: June 10, 2016 01:56 IST2016-06-10T01:56:49+5:302016-06-10T01:56:49+5:30
८६ संभाव्य पूरग्रस्त गावं; आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन.

बुलडाणा जिल्ह्यातील २0 गावांना पुराचा धोका!
बुलडाणा : जिल्हा प्रशासनाने मॉन्सूनपूर्व कामे पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, पाऊस आणि अतवृष्टीमुळे पुराचा वेढा पडणार्या नदीकाठच्या गावासंदर्भातही जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २0 गावं रेड लाईनवर (पूरनियंत्रण रेषा) असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. शिवाय ८६ संभाव्य पूरग्रस्त गावं जाहीर केली आहे. पावसाळ्यादरम्यान या गांवामध्ये नागरिकांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे. आनुषंगिक सूचना संबंधित तहसील कार्यालयास देण्यास प्रारंभ केला आहे. जिल्हा व जिल्ह्याच्या बाहेरून वाहणार्या जवळपास १५ नद्यांचा बुलडाणा जिल्ह्याशी संपर्क येतो. दरवर्षी पावसाळ्यात अतवृष्टी झाली, की या नद्यांना पूर येतो. शिवाय नदीकाठच्या गावांना पुराचा वेढा पडून गावाचा जिल्ह्याशी संपर्क तुटतो. बर्याच वेळा पूर आणि अतवृष्टी या परिसरात मनुष्यहानी, पशुहानी आणि आर्थिक नुकसान होते. बर्याच वेळा शासकीय दळणवळणाची साधनं पुरात अडकून पडल्यामुळे प्रशासनालाही नुकसान सहन करावे लागते. याबाबत पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि सर्व तहसीलदारांची नुकतीच बैठक घेण्यात आली.