तरूणांनो, हक्कासाठी लढा द्या

By Admin | Updated: February 24, 2016 00:38 IST2016-02-24T00:38:00+5:302016-02-24T00:38:00+5:30

देशात शेतकरी शेतमजुरांना किमान वेतनाच्या नावाखाली रोजगार हमी योजनेच्या कामावर नाममात्र मजुरी दिली जाते.

Young people, fight for the rights | तरूणांनो, हक्कासाठी लढा द्या

तरूणांनो, हक्कासाठी लढा द्या

विजय जावंधिया यांचे प्रतिपादन : पवनीत मत्स्य उत्पादक सहकारी संस्थेचा कार्यक्रम
पवनी : देशात शेतकरी शेतमजुरांना किमान वेतनाच्या नावाखाली रोजगार हमी योजनेच्या कामावर नाममात्र मजुरी दिली जाते. असे असताना महागाईचा निर्देशांक वाढला म्हणून शासकिय कर्मचाऱ्यांना वेतन आयोग गठीत करुन सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याची तयारी केंद्र व राज्य सरकार करु लागले आहे. दिवसभर शेतात घाम गाळणाऱ्यांना त्यांचा कष्टाचा मोबदला मिळावा ह्या हक्काच्या लढाईसाठी तरुणांनी पुढाकार घेऊन लढा द्यावा, असे आवाहन शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केले.
मत्स्य उत्पादक सहकारी संस्थेच्या सभागृहात तालुका विकास परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळीे डॉ. विक्रम राखडे, डॉ. राजेश नंदुरकर, डॉ. सुनिल जीवनतारे, गेडाम गुरुजी, दादा आगरे उपस्थित होते.
यावेळी जावंधिया म्हणाले, वेतन आयोगाला आमचा विरोध नाही परंतू पैशाच्या व्यवस्थापनात गावातील लोकांना नागवले जात आहे. महात्मा फुलेनी शेतकऱ्यांचा आसूड ग्रंथात शेतकऱ्यांच्या ज्या समस्यांना वाचा फोडली, देशाच्या स्वातंत्र्यानंतरही समस्या जशाच्या तशा आहेत. वेतन आयोगानुसार वेतन देण्यासाठी शासनाकडे पैसे आहेत. शेतकऱ्यांना देय नसलेली सबसीडी काढून घेतली जात आहे. व्यवस्थेमध्ये शिक्षणाचा खर्च वाढत आहे. कुटूंबाचा खर्च वाढतो, सामाजिक दायित्वाचा खर्च वाढतो. शासनाच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी उत्पादन वाढविले. त्यामुळे दुष्काळ पडल्यानंतरही अन्न धान्याची टंचाई पडणार नाही. परंतू उत्पादन वाढवितांना खर्च वाढला पण शेतमालाला भाव मिळत नाही हे दुर्देव आहे. त्यामुळेच देशात राजकीय, आर्थिक व सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.
याप्रसंगी शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार व मच्छी उत्पादक यांच्या समस्या व त्यावरील उपाययोजना याविषयावर मच्छिमारांचे नेते वासुदेव सुरजुसे, पाणी तज्ञ मनिष राजनकर, नियोजन विषयक तज्ञ प्रविण मोते, जिल्हा मत्स्य उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे, जि.प.च्या माजी अध्यक्षा किसना भानारकर, आर्किटेक्ट खुशाल राखडे, अशोक पारधी व भक्तराज गजभिये यांनी विचार व्यक्त केले.
प्रास्ताविक गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे यांनी केले. संचालन लक्ष्मीकांत तागडे यांनी तर आभार गुलाब मेश्राम यांनी मानले. यावेळी मत्स्य उत्पादक सहकारी संस्थेचे संचालक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Young people, fight for the rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.