तुमसरात ६५२ हेक्टरमध्ये नुकसान
By Admin | Updated: March 17, 2015 00:40 IST2015-03-17T00:40:09+5:302015-03-17T00:40:09+5:30
तालुक्यात ४५ मि.मी. अवकाळी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. ५० टक्केच्या

तुमसरात ६५२ हेक्टरमध्ये नुकसान
तीन विभागांनी केले संयुक्त पंचनामे : नुकसानभरपाई मिळणार नाही, लोकप्रतिनिधी गप्प
तुमसर : तालुक्यात ४५ मि.मी. अवकाळी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. ५० टक्केच्या आत पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनामे करण्यात आले आहे. पंचनामा करणाऱ्या पथकात तहसील प्रशासन महसूल, कृषि विभाग तथा संबंधित गावच्या ग्रामसेवकांचा समावेश आहे. वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले.
२८ फेब्रुवारीपासून १ मार्चपर्यंत झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. तुमसर तालुक्यात ६५२ हेक्टर शेतीतील रब्बी पिकांचे यात हरभरा, लाखोरी, गहू इत्यादी पिकांचा त्यात समावेश आहे. पंचनामे करण्यात आले. गव्हाची लागवड सुमारे ७८७ हेक्टरमध्ये करण्यात आली.
उन्हाळी धान पिकाची लागवड १३६५ हेक्टरमध्ये ५ मार्चपर्यंत केली होती. सध्या लागवड करणे सुरू आहे. तुमसर तालुक्यात ४० मि.मी. पावसाची नोंद आहे. नुकसान भरपाई करीता सुमारे ६५ मि.मी. पावसाची नोंद गरजेची आहे. पंचनामा करणाऱ्या पथकाने ५० टक्केच्या आत नुकसान भरपाईचे पंचनामे केले आहेत. त्यामुळे तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार नाही, अशी माहिती आहे. यासंदर्भात तालुका कृषी अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
एखाद्या पिकाची कापणी झाली व ते पीक शेतात पडून असले तरी त्याला नुकसान भरपाई मिळत नाही. नुकसान भरपाई मिळण्याकरिता ६५ मि.मी. पावसाची नोंद असेण आवश्यक असून ५० टक्केच्या वर नुकसान झाल्याचे पंचनामे करण्यात आले तरच नुकसान भरपाई शासनाकडून प्राप्त होते.
केंद्र शासनाचाही हाच नियम असल्याची माहिती आहे. वास्तविक ५० टक्केच्यावर येथे नुकसान पीकांचे झाले आहे. पंचनामे केल्यावर त्याची दुसरी यादी तयार करणे त्रासाचे असल्याने ५० टक्केच्या आत पंचनामे शासकीय यंत्रणा करीत असल्याचे समजते.
शेतकऱ्यांचे प्रतिनिधी येथे मूग मिळून गप्प आहे. (तालुका प्रतिनिधी)
पावसामुळे पिकांचे नुकसान
पवनी : तालुक्यात रात्री पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, वटाना, मिरची, उडीद, मुंग, कापूस आदी पिके पावसात भिजले आहेत. पावसामुळे आंब्यांचा मोहर गळाल्यामुळे आंब्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे. जनावरांचे वैरण पावसात भिजले आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांवर प्रत्येक वर्षी कोणते ना कोणते आस्माणी संकट येत राहते. यावर्षी बरोबर पाऊस न पडल्यामुळे खरीपाचे पीक झाले नाही. या परिस्थितीतून मार्ग काढत कर्ज घेवून रब्बी पिकाची पेरणी केली. पिक घरी नेण्याच्या स्थितीत असताना दुसऱ्यांदा आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
गव्हाचे पिक वाळून कापनीला आले आहे. पिक शेतात उभे आहे. पण हे गव्हाचे पिक पुर्णपणे पावसात सापडल्यामुळे या पिकाच्या गुणवत्तेवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. तिच स्थिती हरभरा, वटाना, मिरची, उडीद, मुग, कापूस आदींचीही झाली आहे. काहीही ध्यानी मनी नसताना पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना काहीही करता आले नाही. काही शेतकऱ्यांनी पुंजने ताडपत्रीने झाकून ठेवले होते. पण या ताडपत्र्याही अपुऱ्या पडल्या.
यावर्षी आंब्यांच्या झाडांना मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता.
त्यामुळे तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात आंब्यांचे उत्पादन होणे अपेक्षित होते. पण कालच्या व यापुर्वीच्या आलेल्या अवकाळी पावसाने आंबांच्या झाडाचा मोहोर पुर्णत: झडला आहे. त्यामुळे आंब्याचे मोठे नुकसान होवून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. (शहर प्रतिनिधी)