शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित होणार काय?
By Admin | Updated: June 19, 2017 00:36 IST2017-06-19T00:36:32+5:302017-06-19T00:36:32+5:30
खासगी व्यवस्थापनाच्या अंतर्गत सुरू असलेल्या प्राथमिक शाळेपासून तर उच्च माध्यमिक शाळेपर्यंत ...

शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित होणार काय?
विद्यार्थ्यांची सुरक्षा अंधातरी : शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : खासगी व्यवस्थापनाच्या अंतर्गत सुरू असलेल्या प्राथमिक शाळेपासून तर उच्च माध्यमिक शाळेपर्यंत वर्ग पहिली ते १२ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी प्रत्येक शाळेने शाळेत अग्नीशमन यंत्रणेची व्यवस्था करावी, असे शासनाचे निर्देश असताना संबंधित विभागाच्या हेतुपुरस्सर अक्षम्य दुर्लक्षामुळे बऱ्याच शाळामध्ये अग्नीशमन यंत्रणाच कार्यान्वित झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. किमान २०१७-१८ या सत्रापासून सदर अग्नीशमन यंत्रणा प्रत्येक शाळांमध्ये कार्यान्वीत होणार काय, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.
शाळेत अग्निशमन यंत्रणा कार्यान्वीत असावी आणि त्या यंत्रणेची वेळोवेळी पाहणी करून अद्ययावत करण्या यावे, असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र बहुतांश शाळांमध्ये अद्यापर्यंत अग्नीशमन यंत्रणाच कार्यान्वित झाली नसल्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता कोण करणार, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. अग्नीशमन यंत्रणा, मुला, मुलीच्या संख्येनुसार शाळेत स्वच्छता व प्रसाधनगृहे, पिण्याचे शुद्ध व स्वच्छ पाणी, वाचनालय, संगणक कक्ष, मुलीसाठी वेगळे विश्रांती गृह, आवारभिंत, पुस्तकालय, क्रिडांगण, प्रत्येक वर्गात पंखे या सुविधा शाळांनी उपलब्ध करून देणे बंधनकारक असताना अजुनही बऱ्याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी या मुलभूत भौतिक सुविधाच उपलबध नसताना मात्र वेतन व वेतनेत्तर अनुदान सुरू आहे. नियमानुसार अग्नीशमन यंत्रामधील गॅस ११ महिन्यांनी कालबाह्य होते त्यानंतर त्यामध्ये नव्याने गॅस भरणे आवश्यक असते. परंतू ज्या शाळांनी ही यंत्रणा कार्यान्वीत केलेल्या शाळांनी देखील एक्सपायरी डेट नंतर नवीन गॅस भरली नसल्याची शक्यता नाकारता येत नसून ते अग्नीशमन यंत्र फक्त शो पिस म्हणून भिंतीवर टांगलेले दिसून येते. याप्रकरणी संबंधीत विभागाने वेळीच दखल घेवून सर्व शाळांना अग्नीशमन यंत्रणा कार्यान्वीत करण्यास बाद्य करावे व याबाबत प्रथम शिक्षक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे याबरोबरच स्वच्छता, प्रसाधनगृह, संगणककक्ष, विश्रांतीगृह, क्रीडांगण प्रत्येक वर्गात पंखे यासारख्या अन्य भौतिक सुविधा उपलब्ध करण्यास बंधनकारक करून ज्या शाळांनी विहीत कालावधीत सदर सुविधा उपलब्ध केल्या नसतील अशा शाळांवर रीतसर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे.
दुर्घटनेची भिती
अनेक शाळांमध्ये खिचडी बनविण्यासाठी किचन शेड बनविण्यात आलेले आहेत. तर अद्यापही काही शाळात वर्गखोल्यांमध्ये खिचडी शिजविली जाते. त्यामुळे एखादवेळी मोठी दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.