लॉटरी कुणाला ?
By Admin | Updated: May 15, 2014 23:14 IST2014-05-15T23:14:35+5:302014-05-15T23:14:35+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भंडारा लोकसभा निवडणुकीचे १0 एप्रिल रोजी मतदान झाले. तेव्हापासून म्हणजे सव्वा महिन्यांपासून प्रत्येकांच्या तोंडात एकच चर्चा आहे,

लॉटरी कुणाला ?
खुल जा सीम सीम : २६ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आज, उत्कंठा क्षणोक्षणी शिगेला भंडारा : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भंडारा लोकसभा निवडणुकीचे १0 एप्रिल रोजी मतदान झाले. तेव्हापासून म्हणजे सव्वा महिन्यांपासून प्रत्येकांच्या तोंडात एकच चर्चा आहे, निवडून कोण येणार. मतमोजणीचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतशी उत्कंठाही वाढत आहे. विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, ते दुपारी ४ वाजतापर्यंत कळेलच. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे प्रफुल पटेल, भाजप महायुतीचे नाना पटोले, बसपाचे संजय नासरे, आपचे प्रशांत मिश्रा, अपक्ष मोरेश्वर मेश्राम यांच्यासह २६ उमेदवार रिंगणात होते. परंतु खरी लढत ‘पटेल विरुद्ध पटोले’ अशी झाली. आप, बसपा आणि मेश्राम किती मते घेतात आणि कुणाच्या मतांचे गणित बिघडवितात, ही उत्सुकता वाढत आहे. प्रफुल पटेल की नाना पटोले? भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार ना.प्रफुल्ल पटेल रिंगणात आहेत. यापूर्वी ते या क्षेत्राचे चारवेळा प्रतिनिधित्व केले आहे. उद्या मतमोजणीअंती ते विजयी झाल्यास ते पाचव्यांदा लोकसभेत पोहोचतील. सन १९९१ मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढले होते. त्यावेळी १,६३,५५८ मतांनी विजयी झाले होते. १९९६ मध्ये ६,९९३ मतांनी जिंकले. १९९८ मध्ये १९,३0६ मतांची आघाडी घेतली होती. १९९९ मध्ये भाजपचे चुन्नीलाल ठाकूर ३,८१९ मतांनी विजयी झाले होते. २00४ मध्ये भाजपचे शिशुपाल पटले ३,00९ मतांनी निसटता विजय संपादन केला होता. सन २00९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल हे २,५१,९१५ मताधिक्याने विजयी झाले होते. या मतदारसंघातील हे सर्वात मोठे मताधिक्य होते. २00९ मध्ये नाना पटोले यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी २,३७,८९९ मते घेतली. यावेळी पटोले हे महायुतीचे उमेदवार आहेत, पाहू या माळ कुणाच्या गळ्यात पडते. तगडा बंदोबस्त मतमोजणी सामाजिक न्याय भवनात होत असून त्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांसह पॅरामिलिटरी फोर्स, राज्य राखीव पोलीस दल व पोलीस जवान ठिकठिकाणी तैनात करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून ५ पोलीस उपअधीक्षक, ७ पोलीस निरीक्षक, ७६ पोलीस उपनिरीक्षक व ९१0 पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांचा बंदोबस्त राहणार असून साध्या वेशातील पोलिसांचीही बारीकसारीक घटनेवर नजर राहणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा परिषद चौकातून होणारा प्रवेश बंद करण्यात आला आहे. मतमोजणीची तारीख जसजशी जवळ येत होती, तसतसे शर्यतींचे आकडे वाढत राहिले. एक कप चहापासून तर १0 लाखांपर्यंतच्या शर्यती कुणाला तारणार आहेत तर कुणाला मारणार आहेत. या शर्यती एका लोकसभा क्षेत्रासाठी आहेत अशातला भाग नाही. विदर्भासह राज्यात आणि देशात कोण किती जागा घेणार, कोणत्या पक्षाची सत्ता येणार या उत्सुकतेतून हजारांपासून लाखांपर्यंत शर्यती आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार असून निकाल हातात आल्यावर विजयाच्या चर्चांसोबत कोण कितीची शर्यत जिंकले, कोण किती गमावले, हे कळेलच. (जिल्हा प्रतिनिधी)