लोहार व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर
By Admin | Updated: July 20, 2015 00:31 IST2015-07-20T00:31:52+5:302015-07-20T00:31:52+5:30
कधीकाळी शेतकऱ्यांचा आवश्यक घटक म्हणून समजल्या जाणाऱ्या लोहार-सुतार समाजावर अलिकडच्या काळात आर्थिक संकट कोसळले आहे.

लोहार व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर
शासनाचेही दुर्लक्ष : उपजीविका चालविण्याचा प्रश्न
अड्याळ : कधीकाळी शेतकऱ्यांचा आवश्यक घटक म्हणून समजल्या जाणाऱ्या लोहार-सुतार समाजावर अलिकडच्या काळात आर्थिक संकट कोसळले आहे. शेती व्यवसायात आलेल्या अत्याधुनिक साहित्यामुळे लोहार-सुतार समाजाला उपजीविका चालविणे कठीण झाले आहे.
शेतकऱ्यांची शेतीकरिता उपयोगी असलेली अवजारे ही लाकडी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन अवजारे बनविण्याकरिता सुतारासोबत संबंध यायचा.
लोखंडी अवजारे बनविण्याकरिता आपल्या छोट्याशा दुकानात चामडी भाता व भाता ओढण्यासाठी घरातील महिला किंवा मुलांचे सहकार्य घेत होते. दुकानामध्ये ऐरण, घन, वासला, आरी, किकरा पटास, कानस, सांडशी घेऊन लोहार आपले व्यवसाय करीत होते व या व्यवसायावरच लोहार-सुतार समाजाच्या पूर्ण कुटुंबाच्या उदरनिवार्हाची जबाबदारी होती.
यांत्रिक युगामध्ये व दिवसेंदिवस नवनवीन शोधामुळे लोहाराच्या धंद्याला अवकळा आली असून त्यांचा धंदा पावसाळ्याच्या हंगामापुरताच मर्यादित राहला. तो म्हणजे पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेतीची अवजारे, वखराचा लोखंडी विळे, कुऱ्हाड, कुदळ, विळे पाजविणे एवढेच मर्यादित राहल्यामुळे व बाजारामध्ये शेतकऱ्यांची सर्व अवजारे लोखंडी व रेडीमेड मिळत असल्यामुळे लोहाराचा मुख्य धंदा बंद होण्याच्या मार्गावर आहे.
पूर्वीच्या काळामध्ये शेती अवजारे व जास्तीत जास्त लाकडी राहायची आणि ती गावातीलच लोहार-सुताराकडून शेतकरी करून घ्यायची. त्यात शेतकऱ्यांचे मुख्य शेतीकरिता लागणारे वाहन म्हणजे लाकडी बैलगाडी, शेतकऱ्यांची बैलगाडी तयार करण्याकरिता सुताराला जवळपास एक महिन्याचा कालावधी लागायचा. चाक लाकडी असल्यामुळे चाक बनविण्याकरिता सुताराला सुरवातीला चाकाचा बुदल्यामध्ये चौदा लाकडी आरे व त्या आऱ्यावर चाफला गोलाकार देण्याकरिता लाकडी जाड फडीचे पुठ्ठे, त्यावर लोखंडी येठ अशी दोन लाकडे लागायची.
बैलगाडीकरीता दोन सागवान किंवा तिवसाचे झाडाचे धुरे, लाकडी तक्त्यांचा फळ, जुवाडी, खुटाडे, धुरी, मांडगे, हरणी, करवई, खोबन व त्यामध्ये लोखंडी आख व आखेमध्ये दोन चाके घालून लाकडी बैलगाडी करायची. बंडी तयार करण्याकरिता एक महिना लोहाराला मेहनत करावी लागत होती.मेहनतीकरिता लोहाराला शेतकऱ्यांकडून चांगली मिळकत व्हायची.
आता यांत्रिक युगामध्ये शेतकऱ्यांची बैलगाडी हद्दपार होण्याच्या मार्गावर असून ट्रॅक्टर, पावर ट्रिलर, लोखंडी बंडीसारखे यंत्र निघाल्यामुळे सुताराचा लाकडी औजारे बनविण्याचा व्यवसाय बंद होत आहे. खेड्यात घरकूल योजनेमुळे सिमेंटची घरे होत असल्यामुळे सुताराचा घरावरील छत बनविण्याचा धंदा बंद झाला आहे. (वार्ताहर)