गणेशपुरात पाण्यासाठी बोंबाबोंब

By Admin | Updated: May 14, 2016 00:31 IST2016-05-14T00:31:53+5:302016-05-14T00:31:53+5:30

पाण्याला अमृताची उपमा देण्यात येते. मात्र हेच पाणी गणेशपुरवासीयांसाठी पिण्यायोग्य नसल्याने त्यांना जणू 'काळ्या पाण्याची' सजा मिळत आहे.

Waterproof for water at Ganeshpur | गणेशपुरात पाण्यासाठी बोंबाबोंब

गणेशपुरात पाण्यासाठी बोंबाबोंब

आरोग्य धोक्यात : ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष
भंडारा : पाण्याला अमृताची उपमा देण्यात येते. मात्र हेच पाणी गणेशपुरवासीयांसाठी पिण्यायोग्य नसल्याने त्यांना जणू 'काळ्या पाण्याची' सजा मिळत आहे. नळाद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असे असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याऐवजी पाच रूपयात २० लीटर पाणी विकण्याचा प्रकार सुरू केल्याने नागरिकांमध्ये ओरड सुरू आहे.

सुमारे १४ हजार लोकसंख्या असलेल्या गणेशपूर ग्रामपंचायतची सदस्य संख्या १७ आहे. सहा वॉर्डातून हे १७ सदस्य ग्रामवासीयांचे प्रतिनिधीत्व करीत आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी मोठ्या अपेक्षेने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामात सहकार्य व नागरिकांना आरोग्य सुविधा मिळेल या अपेक्षेने मतपेटीतून त्यांना विजयी केले. मात्र निवडणुकीच्या तोंडावर अपेक्षांचे आश्वासन ग्रामस्थांना दिलेल्या या लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या समस्यांकडे अक्षरक्ष: दुर्लक्ष केल्याचे गणेशपूर येथे 'लोकमत आपल्या दारी' या उपक्रमातून फेरफटका मारला असता विदारक चित्र समोर आले.
ग्रामपंचायत प्रशासनाची हद्द असली तरी येथील काही वॉर्डात भंडारा नगरपालिकेने नळजोडणी केली आहे. ग्रामपंचायतच्या नळाद्वारे अशुद्ध व आरोग्यास हानीकारक अशा पाण्याचा पुरवठा होत आहे. यावर ग्रामस्थांनी अनेक ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिले. सोबतच आमसभा, मासिक सभेतही याची चर्चा करण्यात आली. मात्र प्रशासनाने केवळ जलशुद्धीकरण यंत्र बसविल्यानंतरच नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल, असे स्पष्ट करून वेळ काढून नेण्याचा प्रयत्न चालविला आहे.
'लोकमत आपल्या दारी' या उपक्रमातून आज शुक्रवारला लोकमतची चमू गणेशपूर गावातील वॉर्डावॉर्डात फिरली. यावेळी नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरूद्ध पिण्याचे पाणी, नाली साफसफाई, आरोग्य सुविधा याबाबत रोष व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या. येथील नाल्यांची नियमित साफ सफाई होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)

नागनदीमुळे वैनगंगा नदीचे पात्र दूषित
नागनदीचा प्रवाह वैनगंगा नदीत प्रवाहीत होतो. नागनदीच्या माध्यमातून रासायनिकयुक्त पाणी येथून प्रवाहित होत आहे. हे गढूळ पाणी नळाच्या माध्यमातून नागरिकांना पिण्यास देण्यात येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथे जलशुद्धीकरण यंत्राची गरज आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे ग्रामवासीयांना जणू काळ्या पाण्याची सजा देण्यात येत असल्याची प्रचिती येते. यावर तात्पूरता उपाय म्हणून ग्रामपंचायतीने एका खासगी कंपनीच्या माध्यमातून आॅरो प्लँट सुरू केला आहे. मात्र तेथेही नागरिकांना पैसे देवूनच पाणी विकत घ्यावे लागत आहे. असे असतानाही ग्रामपंचायत दरवर्षाला ७०० रूपये पाणीपट्टी वसूली करीत असल्याने रोष आहे.

Web Title: Waterproof for water at Ganeshpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.