पाणीपुरवठा योजना अधांतरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST2020-06-12T05:00:00+5:302020-06-12T05:00:59+5:30
पवनी तालुक्यातील चिचाळ येथे पाणी पुरवठा करण्यात येणारी जलवाहिनी जीर्ण झाल्याने दरवर्षीच पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत ७९ लक्ष रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. सदर योजनेत काम करताना कंत्राटदाराने निकृष्ट साहित्याचा वापर केला. ग्रामपंचायतीनेही गावात दवंडी देऊन टॅक्स वसुली करीत नागरिकांना नवीन नळाची जोडणी करून दिली.

पाणीपुरवठा योजना अधांतरी
प्रकाश हातेल।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिचाळ : चिचाळ येथे पाणीपुरवठा करण्यात येणारी जुनी नळयोजना जीर्ण झाली आहे. परिणामी मुख्यमंत्री पेयजल योजनेचे काम पूर्ण झाले तरी निकृष्ट साहित्य वापराने योजना अपयशी ठरल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सदर योजना अधांतरी असून गावात पाण्यासाठी बोंब सुरु आहे.
विशेष म्हणजे या योजनेंतर्गत कंत्राटदाराला जलवाहिनी तात्काळ बदलवून सात दिवसात काम पूर्ण करण्याचे कळविण्यात आले आहे. अन्यथा आपल्यासोबत केलेला करारनामा रद्द करून नाव काळ्या यादीत घातले जाईल, असेही ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
पवनी तालुक्यातील चिचाळ येथे पाणी पुरवठा करण्यात येणारी जलवाहिनी जीर्ण झाल्याने दरवर्षीच पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत ७९ लक्ष रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली.
सदर योजनेत काम करताना कंत्राटदाराने निकृष्ट साहित्याचा वापर केला. ग्रामपंचायतीनेही गावात दवंडी देऊन टॅक्स वसुली करीत नागरिकांना नवीन नळाची जोडणी करून दिली. मात्र पाणी वाहून नेणारी उर्ध्वनलिका वारंवार फुटत असल्याने नागरिक पाण्यापासून वंचित राहत आहेत. तांत्रिकदृष्ट्या योग्यरित्या जलवाहिनीला थातूरमातूर डागडुजी करून त्यावर काँक्रीट टाकण्यात आले. अशा स्थितीत जवळपास तीन महिने पाणीपुरवठा योजना चालविण्यात आली. याबाबत कंत्राटदाराला वारंवार सूचना देऊनही दुरुस्ती होत नसल्याने ग्रामस्थांचा ग्रामपंचायत प्रशासनावर रोष व्यक्त होत आहे.
कृत्रिम पाणीटंचाई
याबाबत सदर कंत्राटदाराला वारंवार पत्रान्वये कळवूनही कुठलीच कारवाई न झाल्याने गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वापरण्यात आलेली जलवाहिनी बदलवून नवीन जलवाहिनी घालण्यात यावी, अशी बाबही पत्रात नमूद केली आहे.
कंत्राटदाराने वापरलेली जलवाहिनी निकृष्ट दर्जाची असल्याने वारंवार पाण्याची गळती होत आहे. परिणामी गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जलवाहिनी पूर्णपणे बदलविण्याची गरज आहे.
-लोपमुद्रा वैरागडे, सरपंच, चिचाळ