‘त्या’ दगडी पुलातून पाण्याची गळती सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 01:00 IST2019-07-25T00:59:46+5:302019-07-25T01:00:29+5:30
सुरक्षीत रस्ते निर्माण करावे असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहे. परंतु देव्हाडी येथील रेल्वे उड्डापूलाला उद्घाटनापुर्वीच मोठे भगदाड पडले. तो भगदाड बुजविण्यात आला असला तरी उड्डाणपुलावरील खालच्या बाजुने असलेला दगडातून पाण्याची गळती अद्यापही सुरुच आहे.

‘त्या’ दगडी पुलातून पाण्याची गळती सुरुच
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : सुरक्षीत रस्ते निर्माण करावे असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहे. परंतु देव्हाडी येथील रेल्वे उड्डापूलाला उद्घाटनापुर्वीच मोठे भगदाड पडले. तो भगदाड बुजविण्यात आला असला तरी उड्डाणपुलावरील खालच्या बाजुने असलेला दगडातून पाण्याची गळती अद्यापही सुरुच आहे. परिणामी उड्डाणपूल बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. भविष्यात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
देव्हाडी येथील रेल्वे क्रॉसींगवर राज्य शासनाने २४ कोटींचा उड्डाणपूल मंजूर करुन बांधकामालाही सुरुवात केली. मागील पाच वर्षांपासून रेल्वे क्रॉसींगच्या दोन्ही बाजुला उड्डाणपुलाच्या पोच मार्गाचे काम सुरु आहे.
उड्डाणपूल दगडी असून त्यामध्ये भराव करण्यासाठी फलॉय अॅशचा वापर करण्यात आला आहे. १५ दिवसांपूर्वी तुमसर मार्गावरील याच उड्डाणपूलावर खड्डा पडला होता. याची याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर कंत्राटदाराने खड्डा बुजविला होता. मात्र खड्डा शेजारी दगडातून पाणी गळती सुरु आहे. भरावातून पाण्यासह फलॉय अॅश बाहेर निघत आहे. परिणामी उड्डाणपुलाच्या आतमध्ये पोकळी निर्माण झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे या गंभीर बाबीची प्रशासन व संबंधित विभागाने दखल घेतली नाही. अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत पुलाची पाहणीही केली नाही. यासंदर्भात पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सदर उड्डाणपूलाची माहिती घेतल्याची बाब माजी उपसरपंच श्याम नागपुरे यांनी सांगितले.
सिमेंटीकरण करण्याची गरज
उड्डाणपूल पोच मार्गावर डांबरीकरण करण्यात आले आहे. त्याच मार्गातून पाण्याची गळती सुरु आहे. उड्डाणपुलाच्या आतमध्ये पाणी जाऊ नये म्हणून संपूर्ण पोचमार्गाचे सिमेंटीकरण करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात पोचमार्ग हा जीवघेणा ठरु शकतो.
देव्हाडी उड्डाणपूल हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पोच मार्गावर खड्डा पडल्याने उड्डाणपूल बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्थापत अभियंत्याची चमू किंवा पथकाला पाचारण करुन तांत्रिक अडचणी दुर करणे अत्यंत आवश्यक आहे.
- डॉ. पंकज कारेमोरे, काँग्रेस नेते तुमसर