तलावाच्या जिल्ह्यातील ६३९ गावांत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 22:06 IST2019-04-11T22:06:23+5:302019-04-11T22:06:57+5:30

संपूर्ण राज्यात तलावाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारातील तब्बल ६३९ गावे पाणी टंचाइचे चटके सोसत आहे. तलाव आटले असून विहिरीनी तळ गाठला आहे. पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरु आहे. साकोली, पवनी, मोहाडी, तुमसर तालुक्यातील अनेक गावात तिव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

Water shortage in 63 9 villages of Tilak district | तलावाच्या जिल्ह्यातील ६३९ गावांत पाणीटंचाई

तलावाच्या जिल्ह्यातील ६३९ गावांत पाणीटंचाई

ठळक मुद्देउपाययोजना शून्य : तलाव आटले, विहिरींनी तळ गाठला, पाण्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : संपूर्ण राज्यात तलावाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारातील तब्बल ६३९ गावे पाणी टंचाइचे चटके सोसत आहे. तलाव आटले असून विहिरीनी तळ गाठला आहे. पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरु आहे. साकोली, पवनी, मोहाडी, तुमसर तालुक्यातील अनेक गावात तिव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासन निवडणुकीच्या कामात गुंतल्याने आतापर्यंत उपाययोजना शून्य आहे.
भंडारा जिल्ह्यात १३०० वर तलाव आहे. गावागावांत तलाव असल्याने हा जिल्हा टँकरमुक्त म्हणून प्रशासनाने घोषित केला. परंतू जिल्ह्यातील तब्बल ६३९ गावांना पाणी टंचाईचे चटके सोसावे लागत आहे. अनेक गावात नळयोजना असल्या तरी या नळयोजनांनाही घरघर लागली आहे. गावाजवळचे बोडी, तलाव आटले आहे. हातपंपाना तासनतास हापसल्यानंतर बकेटभर पाणी मिळते. विहिरींनीही तळ गाठला आहे. डोक्यावर हांडे घेऊन महिला पाण्यासाठी भटकंती करीत असल्याचे चित्र दिसून येते.
मोहाडी तालुक्यातील करडी पालोरा परिसरातील नैसर्गिक जलस्त्रोत कोरडे पडले आहे. त्यामुळे नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन तयार केलेल्या नळयोजनाही कुचकामी ठरत आहे. तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात पाणी टंचाईची दाहकता वाढली आहे. मोहगाव खदान गावात वारंवार कुत्रीम टंचाई निर्माण होत आहे. येरली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तांत्रिक अडचणीमुळे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अर्धे गाव पाण्यासाठी भटकंती करताना दिसते. पवनी तालुक्यातील चौरस भाग हा सुपीक जमीन आणि पाण्यासाठी प्रसीध्द होता. मात्र वैनगंगा नदीवर गोसेखुर्द येथे धरण झाल्यानंतर या भागातील जलस्त्रोत तळाला गेले आहे. धरण उसाला आणि कोरड घसाला अशी अवस्था या भागाची झाली आहे. साकोली तालुक्यातील एकोडी, पिंडकेपार या परिसरातही पाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाने पाणी टंचाईचा कृतीआराखडा तयार केला आहे. त्यात विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. मात्र एप्रिल महिन्यापर्यंत कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. निवडणुकीच्या कामात प्रशासन व्यस्त असल्याने याकडे दुर्लक्ष झाले.
भंडारा शहरात नळाला केवळ अर्धातास पाणी
भंडारा शहराला वैनगंगा नदीवर असलेल्या पाणीपुरवठा योजनेतून पाणी पुरविल्या जाते. गत महिन्याभरापासून शहरातील नळांना सरासरी अर्धा तास पाणी मिळते. उंच असलेल्या भागात तर दहा ते पंधरा मिनिटच नळाला पाणी येते. त्यामुळे दिवसभराचे पाणी साठवून कसे ठेवावे असा प्रश्न आहे. शहरातील जलवाहिन्यांची अवस्था बिकट असून दुषीत पाणी पुरवठाही होत आहे. काही वॉर्डात ठिकठिकाणी जलवाहिनीचे पाईप फुटलेल्या स्थितीत आहे.
भूजलपातळी गेली ३०० फूट खाली
भंडारा जिल्ह्यातून जीवनदायी वैनगंगा बारमाही वाहते. मात्र गत काही वर्षांपासून भूजल पातळीत झपाट्याने घट येत आहे. चुलबंद नदीतिरावरील अनेक गावात भूजलपातळी ३०० फूटापर्यंत खाली गेली आहे. ३०० फूट बोरवेल खोदल्यावरही पाणी लागत नाही. पाण्याचा वारेमाप उपसा आणि जलपुर्नभरणाकडे दुर्लक्ष यामुळे भूजल पातळीत झपाट्याने खाली जात आहे. प्रशासन विविध उपाययोजना करीत असले तरी त्या सर्व उपाययोजना कागदावर असल्याचे दिसून येते.

Web Title: Water shortage in 63 9 villages of Tilak district