वैनगंगा नदीत वाहते दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:37 PM2019-07-17T22:37:40+5:302019-07-17T22:38:01+5:30

पवित्र आणि जीवनदायी असलेली वैनगंगा नदीत आता अशुध्द पाणी दुर्गंधीयुक्त पाणी वाहू लागले आहे. गत काही वर्षांपासून नागपूरातून वाहणाऱ्या नाग नदीच्या प्रवाहासोबत रसायनयुक्त आणि मलमुत्राचे पाणी वैनगंगेत येत आहे. परिणामी आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शेती आणि फळबागानाही त्याचा फटका बसत आहे. हा सर्व प्रकार माहित असतानाही नदी शुध्दीकरणासाठी कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही.

The water flows through the Wainganga river | वैनगंगा नदीत वाहते दूषित पाणी

वैनगंगा नदीत वाहते दूषित पाणी

Next
ठळक मुद्देनाग नदीचा फटका : आरोग्यासह पिकांवरही परिणाम

अशोक पारधी।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : पवित्र आणि जीवनदायी असलेली वैनगंगा नदीत आता अशुध्द पाणी दुर्गंधीयुक्त पाणी वाहू लागले आहे. गत काही वर्षांपासून नागपूरातून वाहणाऱ्या नाग नदीच्या प्रवाहासोबत रसायनयुक्त आणि मलमुत्राचे पाणी वैनगंगेत येत आहे. परिणामी आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शेती आणि फळबागानाही त्याचा फटका बसत आहे. हा सर्व प्रकार माहित असतानाही नदी शुध्दीकरणासाठी कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही.
भंडारा जिल्ह्याला सुपिक करणारी वैनगंगा नदीचे विशाल पात्र आहे. बारमाही वाहणारी या नदीमुळे जिल्ह्यात समृध्दी आली. वैनगंगेच्या तिरावर धान शेती फुलली. फळबागा व इतर पिकेही मोठ्या प्रमाणात होवू लागली. जणू वैनगंगा भंडारा जिल्ह्याची जीवनदायीनी ठरली. मात्र गत काही वर्षांपासून वैनगंगेत अशुध्द पाणी येऊन मिळत आहे. गोसेखुर्द प्रकल्प झाल्यापासून त्यात आणखी भर पडली. नागपूरातून वाहणारी नाग नदी आंभोराजवळ वैनगंगेला मिळते. नागपूरातून वाहत येणाºया नागनदीत मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त व मलमुत्राचे पाणी असते. तेच पाणी वैनगंगेच्या पाण्यात मिसळून अशुध्द आणि दुर्गंधी युक्त होत आहे. राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणात पाणी साठते. धरणातील दुषीत पाणी वैनगंगा नदी पात्रात डाव्या, उजव्या कालव्याच्या माध्यमातून नागरिकांना पिण्यासाठी व शेती उपयोगासाठी सोडले जाते. तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात भंडारा शहरासह अनेक गावांनाही या दुषीत पाण्याचा फटका सहन करावा लागतो. दुर्गंधीयुक्त पाण्यामध्ये नागपुरातील विविध कारखान्यातील रसायने असतात. या रसायनाचा परिणाम मानवी जीवनावर होऊ शकतो. परंतु याकडे अद्यापपर्यंत कुणाचेही लक्ष नाही. नदी पात्रातील पाणी प्रयोगशाळेत पाठविल्यास हा प्रकार उघडकीस येवू शकतो. परंतु यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही. शुध्द पाण्यासाठी नागरिक प्रशासनाच्या नावाने ओरड करीत आहेत. परंतु कोणत्याही उपाययोजना होत नाही. शेतातील पिकेही या पाण्यामुळे रोगग्रस्त होत आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींना सांगुनही उपयोग झाला नाही.
नाग नदीचे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यापुर्वी ते शुध्द करण्यात यावे, किंवा नदीजवळ प्रकल्पाअंतर्गत नाग नदीचे प्रवाह इतरत्र वळून दुषीत होणाऱ्या वैनगंगेला वाचविता येवू शकते. यासाठी गरज आहे ते इच्छाशक्तीची.
युवाशक्ती संघटनेचे अर्धदफन आंदोलन
वैनगंगा नदीच्या शुध्दीकरणासाठी पवनी येथील युवाशक्ती संघटनेच्या वतीने अर्धदफन आंदोलन महिन्याभरापुर्वी करण्यात आले होते. तरुणांनी वैनगंगेच्या नदीपात्रात स्वत:ला अर्धेअधिक गाडून घेतले होते. या आंदोलनानंतर वैनगंगा शुध्दीकरणाचा प्रश्न एरणीवर येईल असे वाटत होते. परंतु प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. आजही दररोज लाखो लिटर अशुध्द पाणी नागनदीच्या माध्यमातून गोसे प्रकल्पात साचले जात आहे.
विविध आजाराला आमंत्रण
रसायनयुक्त आणि मलमुत्राचे पाणी नकळत नागरिकांपर्यंत पोहचत असल्याने आजाराला आमंत्रण मिळत आहे. खाजेसह विषाणुजन्य आजार आणि डायरिया नदीतिरावरील अनेक गावांमध्ये दिसून येत आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पवनी परिसरातील अशा रुग्णांची संख्या मोठी असते. आजारावर उपचार करताना नागरिकांच्या नाकीनऊ आले आहे. गावागावांत वैनगंगेच्या दुषित पाण्यामुळे रुग्ण दिसत आहे. आरोग्याच्या समस्येकडे लक्ष देण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आहे.

Web Title: The water flows through the Wainganga river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.