कृषी योजनांच्या लाभाची प्रतीक्षा
By Admin | Updated: January 14, 2016 00:49 IST2016-01-14T00:49:03+5:302016-01-14T00:49:03+5:30
पवनी तालुक्यातील कोंढा व कोसरा दोन्ही गावे मध्यवर्ती गावे असून या गावांची लोकसंख्या १२ हजारच्या आसपास आहे.

कृषी योजनांच्या लाभाची प्रतीक्षा
कोंढा (कोसरा) : पवनी तालुक्यातील कोंढा व कोसरा दोन्ही गावे मध्यवर्ती गावे असून या गावांची लोकसंख्या १२ हजारच्या आसपास आहे. पण या गावातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांचा गेल्या खरीप, रब्बी हंगामात लाभ मिळाला नाही. त्यामुळे विभागाचा उपयोग काय, असा प्रश्न शेतकरी विचारीत आहेत.
तालुका कृषि अधिकारी, कार्यालय पवनी येथे आहे. प्रत्येक मोठ्या गावासाठी कृषी पर्यवेक्षक कृषी विभागाचे आहे. तसेच मंडळ कृषी अधिकारी, कार्यालय कोंढा येथे आहे. सध्या हे कार्यालय पालोरा चौ. येथे स्थलांतरीत झाले आहे. दोन कृषी पर्यवेक्षक कोंढा १ व कोंढा २ यांच्या नेतृत्वात कृषी सहायक गावासाठी आहेत. पण खरीप, रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पिक घेण्यासाठी कोणतेच मार्गदर्शन झाले नाही. कृषी सहायक फक्त कागदी रेकॉर्ड रंगविण्यात धन्यता मानत असल्याने शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही, असा आरोप कोंढा येथील शेतकऱ्यांनी केला आहे. कोंढा, कोसरा येथील कृषी सहायक पद अनेक दिवसापासून रिक्त आहे. इ.डी. पाकमोडे यांचेकडे अतिरिक्त कार्यभार आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे दुष्काळी परिस्थितीमुळे कंबरडे मोडले. रब्बी हंगामात कोंढा, कोसरा येथील शेतकऱ्यांना बि-बियानाची मदत मिळाली नाही. पण याचा लाभ कोणालाच मिळाला नाही म्हणून कृषी विभागाविषयी प्रचंड असंतोष शेतकऱ्यात आहे. खरीप हंगामात धानाला अनेक रोग लागले. याची माहिती शेतकरी कृषी केंद्र मालकाकडून घेवून औषधी खरेदी घेवून औषधाची फवारणी करताना दिसले. कोंढा केंद्रात गेल्या ३ वर्षात एकाही शेतकऱ्यांना शासनाच्या बि-बियाणे याची मदत मिळाली नाही. अशावेळी १२ हजार लोकवस्तीचे गाव कृषी विभागाच्या योजनापासून वंचित आहे. कृषी विभाग हा पांढरा हत्ती शेतकऱ्यांसाठी ठरला आहे. शेतकऱ्यांच्या विभागावर प्रचंड नाराजी असल्याने या विभागाने शेतकऱ्यांना शासनाच्या कृषीसंबंधी योजनाची माहिती देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)