वैनगंगा शुद्धीकरणाला आणखी चार वर्षे लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:40 IST2018-02-10T23:40:13+5:302018-02-10T23:40:44+5:30
एकेकाळी भंडारा जिल्ह्यासाठी ‘जीवनदायिनी’ ठरलेली वैनगंगा नदीचे पात्र ‘जीवघेणे’ ठरत आहे.

वैनगंगा शुद्धीकरणाला आणखी चार वर्षे लागणार
आॅनलाईन लोकमत
भंडारा : एकेकाळी भंडारा जिल्ह्यासाठी ‘जीवनदायिनी’ ठरलेली वैनगंगा नदीचे पात्र ‘जीवघेणे’ ठरत आहे. नागपूरच्या नागनदीचे सांडपाणी लाखो हेक्टर जमिन सिंचित करणाऱ्या गोसेखुर्द धरणात सोडले जात आहे. त्यामुळे वैनंगगा नदी प्रदूषित झाली आहे. या नदीच्या शुद्धीकरणासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असले तरी ही नदी शुद्धीकरणासाठी आणखी चार वर्षे लागणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे यांनी सांगितले.
पालकमंत्री झाल्यानंतर दर शनिवारला भंडाऱ्यात येण्याचे जाहीर केल्यानंतर ते जनतेच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आले होते. तत्पूर्वी विश्रामगृहात पत्रकारांकडून जिल्ह्यातील समस्यांवर चर्चा केली. यावेळी एका प्रश्नावर त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी ना.बावनकुळे म्हणाले, नागनदीचे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. आतापर्यंत केवळ ७० टक्के पाणी कोराडी, मौदा येथे रोखण्याचे काम झाले आहे. उर्वरित ३० टक्के पाणी वैनगंगा नदीत येत आहे. हे पाणी पूर्णत रोखण्यासाठी उमरेडकडे वळवावे लागणार आहे. त्यासाठी आणखी चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे दूषित पाण्याची समस्या तूर्तास तरी दूर होण्याची शक्यता नाही.
भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडे वाढीव २५ कोटी रूपयांची मागणी आपण केली असून त्या निधीतून रखडलेली कामे मार्गी लावण्यात येतील. याशिवाय जिल्हा नियोजनातून कपात केलेला ३० टक्के निधीही परत आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे या जिल्ह्याची जबाबदारी असल्यामुळे आता भंडारा जिल्ह्यातील विकास दिसू लागेल, याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.
केव्हा संपणार या यातना?
नागपूर शहरातील सांडपाणी नाग नदीतून जाते. त्यामुळे ही नदी दूषित झाली आहे. आता या नदीतील पाणी गोसेखुर्द धरणात जावून मिळत आहे. एकीकडे जलस्तर वाढविण्यासाठी गोसेखुर्दचे पाणी अडविण्यात आले आहे. त्यामुळे बॅकवॉटरमुळे धरण ते भंडारापर्यंत जलस्तर वाढला आहे. त्याचा फटका नदी काठावर वसलेल्या भंडारा शहरासह अनेक गावांना बसत आहे. परिणामी नदी काठावरील पाणीपुरवठा योजनाही प्रभावित झाली आहे.