नळयोजनेसाठी गावकरी एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:00 IST2020-02-05T06:00:00+5:302020-02-05T06:00:39+5:30
सरपंचाने विचारपूस करताच कंत्राटदाराने गावकºयांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने गावकरी नळयोजनेच्या कामासाठी एकत्र आले आहेत. गावात नळयोजनेअंतर्गत पाईपलाईनचे खोदकाम करताना एक फूट अंतर खोलीचे खोदकाम करण्यात आले आहे. गावात टाकीचे बांधकाम करण्यात आले असले तरी टाकीभोवती कोणतेही कुंपण करण्यात आलेले नाही. पाणी पुरवठा करण्यासाठी बोअरवेल खोदण्यात आली आहे.

नळयोजनेसाठी गावकरी एकवटले
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील धनेगाव येथील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत ३५ लाख रूपयांचा नळ योजनेच्या कामात अनियमीतता होत असल्याच्या अरोप करीत गावकरी कंत्राटदाराविरोधात एकवटले आहे. गावात कंत्राटदाराने कामाला सुरूवात केली तरी अनेक ठिकाणी गुणवत्तापूर्ण काम केले नसल्याने गावकरी संतप्त झाले आहेत.
धनेगाव येथे मुख्यमंत्री ग्राम पेयजल योजनेंतर्गत सुरू असलेल्या नळ योजनेच्या कामात अनियमितता झाल्याने २६ जानेवारीची ग्रामसभा वादळी ठरली. गावकऱ्यांनी सरपंचाकडे तक्रार केल्यानंतर प्रशासनाकडून या कामाची दखल घेण्यात आली. मात्र तरीही २६ जानेवारीच्या ग्रामसभेत नळयोजनेचा विषय गावकऱ्यांनी उचलून धरला.
सरपंचाने विचारपूस करताच कंत्राटदाराने गावकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने गावकरी नळयोजनेच्या कामासाठी एकत्र आले आहेत.
गावात नळयोजनेअंतर्गत पाईपलाईनचे खोदकाम करताना एक फूट अंतर खोलीचे खोदकाम करण्यात आले आहे. गावात टाकीचे बांधकाम करण्यात आले असले तरी टाकीभोवती कोणतेही कुंपण करण्यात आलेले नाही. पाणी पुरवठा करण्यासाठी बोअरवेल खोदण्यात आली आहे. मात्र बोरवेलमधील पाणी हे पिण्यासाठी शुद्ध नसल्याने पाणी फिल्टर करणे गरजेचे आहे. बोरवेलमधून उपसा करणाऱ्या मोटरपंप किती एचपीचे आहे याची साधी पुसटची कल्पनादेखील ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आलेली नाही.
गावात वस्ती असताना नळयोजनेचे काम चांगले दर्जेदार पद्धतीने होणे गरजेचे होते. असे असताना कंत्राटदाराकडून गावाबाहेर अर्धा किलोमीटर अंतरावर कोणतीही वस्ती नसताना पाईपलाईनचे खोदकाम करण्यात आले आहे. अर्धवट कामे करून कंत्राटदार सदर योजनेतून पैसे उकळण्याचे काम करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
पेयजल योजना ही ग्रामवकऱ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी असली तरी कंत्राटदार अर्धवट कामे करून फक्त निधी उचलण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा गावकऱ्यांत सुरु आहे. त्यामुळे गावकरी चांगलेच संतप्त झाले आहेत.
ग्रामसभेत एकमताने सदर कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून पुन्हा एकदा नवीन कंत्राटदाराकडून नळ योजनेचे काम करण्यासाठी गावकरी ठाम आहेत. कंत्राटदाराचे कंत्राट त्वरीत रद्द न केल्यास माजी सरपंच छगनलाल पारधी यांच्या नेतृत्वात उपोषण करण्याचा ईशारा गावकऱ्यांनी दिला आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे काम करत नसून गावकऱ्यांशी मुजोरी करीत असल्याने गावकरी कंत्राटदाराविरोधात ग्रामसभेत एकमताने ठराव घेणार आहेत.