आवक घटल्याने भाज्यांचे दर कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST2019-11-25T06:00:00+5:302019-11-25T06:00:48+5:30

हिवाळ्याच्या सुरुवातीस जिल्ह्यातील विविध भागातून स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढत असते. परंतु यावर्षी झालेल्या परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याने बाजारपेठेत स्थानिक शेतकऱ्यांचा माल कमी येत असल्याने भाजीपाल्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहे.

Vegetable prices plummeted as arrivals declined | आवक घटल्याने भाज्यांचे दर कडाडले

आवक घटल्याने भाज्यांचे दर कडाडले

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचाही परिणाम : गृहिणींचे बजेट कोलमडले

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दिवाळीच्या पर्वात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिवाळाच्या सुरुवातीलाच भाज्यांचे दर सर्वत्र गगणाला भिडले आहेत. भाजीमार्केटमध्ये मेथी, वांगे, टोमॅटो, कोबी, हिरव्या मिरची अशा सर्वच भाज्यांचे दर वाढले असल्याने सर्व सामान्यांचे नियोजन कोलमडू लागले आहे.
हिवाळ्याच्या सुरुवातीस जिल्ह्यातील विविध भागातून स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढत असते. परंतु यावर्षी झालेल्या परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याने बाजारपेठेत स्थानिक शेतकऱ्यांचा माल कमी येत असल्याने भाजीपाल्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. मेथी ८० ते १०० रुपये किलो, टोमॅटो ३० ते ४० रुपये किलो तसेच वांगे ६० रुपये, पालक २५ रुपये जुडी, हिरवी मिरची ४० रुपये किलो दराने मिळत असल्याने अनेकांना भाजीपाला खरेदी करणे मुश्कीलीचे होत आहे. त्यातच गृहिणींना आपले बजेट सांभाळतांना कसरत करावी लागत आहे.
यावर्षी जुन, जुलै महिना वगळता सप्टेंबर ते आॅक्टोबर अखेरपर्यंत पावसाने सातत्य राखल्याने अनेक ठिकाणी भाजीपाला पिके जागेवरच उद्ध्वस्त झाली. पावसाचे प्रमाण प्रचंड होते. याचा खरीप हंगामाला फटका बसला. त्याचप्रमाणे भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने भाजीपाल्याचे दर यावर्षी कायम गगणाला भिडलेले दिसून येत आहे.
जास्त पावसामुळे अनेक ठिकाणी भाजीपाला पिकांमध्ये पाणी साचल्याने जागेवरच पिके सडली. तर काही ठिकाणी पावसामुळे मातीतच गाडली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला पिकाचे अपेक्षीत उत्पन्न मिळाले नाही. याचा परिणाम भाज्यांच्या दरावर सातत्याने होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी नागपूरवरुन जिल्ह्यात आयात केला जाणारा भाजीपाला ग्राहकांना चढत्यादराने खरेदी केल्याशिवाय पर्याय नाही. शिवाय ताजा भाजीपाला मिळणेही दुरापास्त होत आहे.
दिवाळीनंतर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून शेतकरी स्वत:च्या शेतात पिकविलेला भाजीपाला विक्रीसाठी आणत असतात. परंतु यावर्षी मात्र हे चित्र दिसून येत नाही. भाजीपाला पिकांसोबतच अनेक शेतकरी लौकी, तुरीच्या शेंगा, सिताफळे, आवळा आदी विविध फळे विक्रीसाठी आणत असतात. परंतु यावर्षी मात्र भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्यामुळे दारावर येऊन विक्री करणाºया भाजीपाला विक्रेत्यांची संख्यादेखील रोडावली आहे.
बाजारात जाऊन भाजीपाला खरेदी केल्याशिवाय पर्याय नाही. हिवाळा आला की, मेथी, पालक, चवळी या पालेभाज्यांना मोठी मागणी वाढत असते. भंडारातील भाजीबाजारात कारले, भोपळा, हिरवी मिरची आदी भाज्यांची मागणी जास्तीच्या दराने होत आहे. मोठा बाजार परिसरात शहराच्या जवळील सुरेवाडा, खमारी, खरबी, परसोडी, आंबाडी, सिल्ली, कारधा या विविध गावातून भाजीपाल्यांची आवक होत नसल्याचे चित्र आहे. गत वर्षीच्या तुलनेत आॅक्टोबरमध्ये सर्व भाज्यांचे दर ४० ते ५० रुपये किलो प्रमाणे होते. मात्र यावर्षी सर्वच भाज्यांचे दर किमान ६० ते ८० रुपये किलोच्या आसपास आहेत. अनेक विक्रेत्यांनी स्थानिक भाजीपाल्याची कमी झाल्याने दर वाढल्याचे सांगितले.

Web Title: Vegetable prices plummeted as arrivals declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.