मिरेगावच्या मुख्याध्यापकाने गाजविले दिल्ली विद्यापीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST2020-03-08T06:00:00+5:302020-03-08T06:00:24+5:30
लाखनी तालुक्यातील मिरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत डमदेव कहालकर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर करून शैक्षणिक साहित्याची निर्मिती आणि त्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व रोजगारक्षम उपक्रम राबवितात. त्यांच्या या उपक्रमशीलतेची राज्यभरात ख्याती आहे.

मिरेगावच्या मुख्याध्यापकाने गाजविले दिल्ली विद्यापीठ
मुखरू बागडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना अलिकडे नाव ठेवले जात आहे. प्रवेशासाठी शिक्षकांना विद्यार्थी शोधावे लागत आहेत. जिल्हा परिषद शाळांची अवस्था सर्वत्र बकाल झाली असताना एका उपक्रमशिल शिक्षकाने आपल्या शाळेचेच नाही तर संपूर्ण राज्याचे नाव उज्ज्वल केले. दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय परिषदेत दोन दिवस व्याख्यान देऊन मिरेगावच्या शाळेचा डंका वाजविला.
लाखनी तालुक्यातील मिरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत डमदेव कहालकर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर करून शैक्षणिक साहित्याची निर्मिती आणि त्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व रोजगारक्षम उपक्रम राबवितात. त्यांच्या या उपक्रमशीलतेची राज्यभरात ख्याती आहे. अशातच राष्ट्रीय शिक्षण नियोजन व प्रशिक्षण संस्थेने देशातील उपक्रमशील शाळांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी डमदेव कहालकर यांनी चित्रफित आणि बुकलेट तयार करून आपल्या शाळेची माहिती दिल्लीच्या निपा संस्थेला पाठविली. त्यांच्या या उपक्रमाने प्रभावित होऊन दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात आयोजित शैक्षणिक संशोधन परिषदेत व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले.
दिल्ली येथे गत आठवड्यात झालेल्या या परिषदेत डमदेव कहालकर यांनी देशभरातील शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षकांसमोर व्याख्यान दिले.
आपल्या उपक्रमांची माहिती दिली. शाश्वत बदल घडविण्यासाठी कल्पक बुद्धीने काय केले याची माहिती दिली. नैसर्गिक घडामोडीतून विद्यार्थ्यांना कसे शिकविता येते. भौतीक सुविधांचा आग्रह न धरता वर्तमानातून शैक्षणिक कार्य निष्ठेने कसे करता येते याची विस्तृत माहिती त्यांनी मांडली. त्यांच्या या व्याख्यानाने सर्वच अवाक झाले.
देशभरातील शिक्षणतज्ज्ञांनी एकमेकांना दिलेली शैक्षणिक शिदोरी मी शेवटपर्यंत सांभाळणार आहे. मला मिळालेली नवी दृष्टी समाजाच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रकाशमान करेल. पुस्तकी ज्ञानासोबत निसर्गाच्या सहवासातून घेतलेले ज्ञान इतरांना प्रेरणादायी ठरेल. विद्यार्थी हा घटक महत्वाचा आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानगंगा प्रवाहित ठेवणार आहे.
- डमदेव कहालकर, मुख्याध्यापक, मिरेगाव.