तुमसर-रामटेक महामार्ग ठरतोय धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:00 IST2020-08-19T05:00:00+5:302020-08-19T05:00:46+5:30
तुमसर- रामटेक- भंडारा असा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावरील मांगली, खापा शिवारात रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. चिखलातूनच वाहनधारकांना येथे मार्ग काढावा लागतो. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना वाहन कसे चालवावे असा विचार पडतो. रात्रीच्या वेळी तर वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते.

तुमसर-रामटेक महामार्ग ठरतोय धोकादायक
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर- रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील मांगली, खापा शिवारात कासवगतीने कामे सुरु असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता असा प्रश्न वाहनधारकांना पडतो. खड्ड्यातून दुचाकी काढताना मोठी कसरत करावी लागते. जड वाहतुकीला धोका निर्माण झाला असून रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल साचला आहे. राष्ट्रीय महामार्गाचे नियंत्रण असतानाही हा रस्ता बांधकाम नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसत आहे.
तुमसर- रामटेक- भंडारा असा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावरील मांगली, खापा शिवारात रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. चिखलातूनच वाहनधारकांना येथे मार्ग काढावा लागतो. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना वाहन कसे चालवावे असा विचार पडतो. रात्रीच्या वेळी तर वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते.
गत दीड वर्षापूर्वी या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली होती. परंतु मांगली व खापा शिवारात विशेषत: गावातून जाणाऱ्या रस्ताचे अद्यापही बांधकाम करण्यात आलेले नाही. याबाबत कुणीच बोलायला तयार नाही. सर्वाधिक वर्दळ याच शिवारात आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत आहे. कामचे नियंत्रण नागपूर मुख्यालयातून होत असल्याने स्थानिक पातळीवर सर्व अनभिज्ञ आहेत. सध्या रस्त्याची कामे बंद आहेत. पावसाळ्यामुळे बंद की तांत्रिक कारणामुळे बंद आहे याची माहिती कुणीच द्यायला तयार नाही. लोकप्रतिनिधींना याबाबत तक्रार करण्याची गरज आहे. सर्वसामान्यांचा जीव येथे धोक्यात आला आहे.
अपघाताचे प्रमाण वाढले
मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने वाहनधारक त्रस्त झाले असून मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.याकडे वेळीच लक्ष न दिल्यास रस्ता आणखी खड्डेमय होणार आहे. यासाठी लोकप्रतिनीधींनी पुढाकार घ्यावा अशी परिसरातील नागरिकांतून मागणी होत आहे.