जिल्ह्यात २ लाख ३१ हजार शेतकरी दोन हेक्टरखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 22:45 IST2019-02-24T22:43:19+5:302019-02-24T22:45:00+5:30
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम युद्धस्तरावर सुरु आहे. जिल्ह्यातील दोन लाख ५३ हजार शेतकऱ्यांपैकी २ लाख ३१ हजार शेतकरी दोन हेक्टर आतील अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. रविवारी या योजनेच्या लाभ वितरणाचा प्रातिनिधीक शुभारंभ येथील जिल्हा परिषद सभागृहात करण्यात आला.

जिल्ह्यात २ लाख ३१ हजार शेतकरी दोन हेक्टरखाली
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम युद्धस्तरावर सुरु आहे. जिल्ह्यातील दोन लाख ५३ हजार शेतकऱ्यांपैकी २ लाख ३१ हजार शेतकरी दोन हेक्टर आतील अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. रविवारी या योजनेच्या लाभ वितरणाचा प्रातिनिधीक शुभारंभ येथील जिल्हा परिषद सभागृहात करण्यात आला.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये दिले जाणार आहे. तीन टप्प्यात मिळणाऱ्या या निधीसाठी प्रशासन याद्या तयार करीत आहेत. ५ फेब्रुवारीपासून याद्या तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. २४ फेब्रुवारीपर्यंत १ लाख ६ हजार शेतकऱ्यांची माहिती संकलीत करण्यात आली. या आॅनलाईन माहितीत शेतकऱ्यांचे नाव, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व इतर तपशील आहे. इतर शेतकऱ्यांची माहितीही लवकरच संकलीत केली जात आहे. संकलीत केलेली माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड केल्या जात आहे. त्यानंतर त्यांची छाननी करण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांची नावे अंतिम केली जात आहे.
पहिल्या टप्प्यात ६ हजार १७७ शेतकºयांची नावे पात्र ठरली आहेत. त्यातील २५०० शेतकऱ्यांची नावे अंतीम तयार करण्यात आली असून त्यांच्या खात्यात पैसे लवकरच वळते केले जाणार आहे. जिल्हा परिषद सभागृहात प्रातिनिधीक स्वरुपात रविवारी निधी वितरण सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, किसान सन्मान योजनेचे नोडल अधिकारी विजय भाकरे, उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आर.एम. खांडेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चव्हाण, तहसीलदार अक्षय पोयाम उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कृषी सन्मान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना तात्काळ मिळावा यासाठी कृषी विभाग, पंचायत विभाग, सेवा सहकारी संस्था प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी तीन टप्प्यात ६ हजार रुपये जमा केले जाणार आहेत. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना त्याचा मोठा आधार होणार आहे.
९० टक्के शेतकरी अल्प भूधारक
जिल्ह्यात २ लाख ५३ हजार शेतकरी असून त्यापैकी २ लाख ३१ हजार म्हणजे ९० टक्के शेतकरी अल्प भूधारक असल्याचे शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून पुढे आले आहे. त्यातही १ हेक्टरपेक्षा कमी असलेल्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख ५० हजार आहे. प्रमुख धान उत्पादक असलेल्या या जिल्ह्यात अत्यल्प भूधारकांची संख्याही अधिक आहे. यातील पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने लाभ देण्यास भंडारा जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. महसूल वसुली, निवडणूक कामे असतानाही प्रशासन शेतकऱ्यांसाठी याद्या तयार करीत आहेत. या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रभावीपणे केली जात असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे वळते होतील.
-विजय भाकरे, जिल्हा नोडल अधिकारी, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना.