सूर्याच्या प्रकोपाने शेतातील पिके करपली
By Admin | Updated: May 21, 2017 00:17 IST2017-05-21T00:17:52+5:302017-05-21T00:17:52+5:30
बळीराजा... भर उन्हात कशाचीही तमा न बाळगता शेतात दिवसरात्र राबराब राबतो. खरिपाच्या पूर्वतयारीची शेतकरी लगबग करीत असला तरी,

सूर्याच्या प्रकोपाने शेतातील पिके करपली
पारा ४६ अंशाच्या घरात : जनजीवन प्रभावित, पिकांची मान टाकली, भाजीपाल्यांवर अळींचा प्रादुर्भाव
मुखरू बागडे । लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : बळीराजा... भर उन्हात कशाचीही तमा न बाळगता शेतात दिवसरात्र राबराब राबतो. खरिपाच्या पूर्वतयारीची शेतकरी लगबग करीत असला तरी, त्यांच्यासमोर आता शेतातील धानपिक व भाजीपाला धार्जिनीचे पीक वाचविण्याचा मोठा पेच निर्माण झाला आहे. उन्हाची प्रखरता व विद्युत भारनियमण या दोन्हीच्या कचाट्यात शेतकऱ्यांची शेती व भाजीपाला अडकला असून त्यांच्या आर्थिक संकट घोंगावत आहे.
नदीकाळावरील व बारमाई भरपूर पाण्याच्या विहिरी, बोअरवेल्स, फिल्टरपंप आटल्याने पिकांनी मान खाली टाकली आहे. शेतकरी सुमार अडचणीत आला आहे. भाजीपाल्यात अतिउष्णतेने अळी, बुरशीने जोर धरला असून उत्पादनाची पुरी ऐशीतैशी झाली आहे. शेतात विहिर आहे, पण त्यात पाणी नाही. तर ज्यांच्याकडे पाणी आहे, त्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही. असा दुहेरी मारा त्यातल्या त्यात भारनियमण व उष्णतेचा परिपात यामुळे शेतकऱ्यांना पिकांबाबत विचार करूनच घामाघुम होतानाची परिस्थिती सध्याची आहे.
अगदी सकाळपासूनचं उष्णतेचा कळस गाठत आहे. त्यामुळे भाजीपाला धार्जिनी पिकांसापासून कसेबसे आर्थिक उत्पन्न घेता येईल, असा विचार करून शेताता भाजीपाला पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे गणित पुरते कोलमडले आहे. त्यामुळे सावकारी कर्ज, बँक व सोसायटी कर्ज व त्यांनतर बचत गटातून घेतलेले हातऊसणवारी याच्या व्याजाच्या चक्रव्यूव्हात आता शेतकरी सापडला आहे. जलस्त्रोत पुरता कोरडा पडल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला वाचविण्यासाठी कसरत करावी लागत असल्याने घामांसह डोळ्यातून आसवेही गाळावे लागत आहे. अशा परिस्थितीतून कसाबसा वाचविलेला भाजीपाला विक्रीसाठी बाजारात नेल्यावर कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. निसर्गचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना वाचविण्यासाठी प्रशासनाने मदत करण्याची गरज आहे.
मे हिटने प्रभाव तेज केल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस सुर्य अधिकच तापत असल्याने भविष्याची चिंता वाढली आहे. पाण्याची पातळी अगदी खोल गेली असून पिकांनीसुद्धा मान टाकली आहे. विजेच्या कमी दाबाच्या पुरवठ्याने कुलर, पंखे, फिरतच नसल्याने उन्हाळा असह्य वाटत आहे.
चुलबंध नदीकाठावरील लोहारा, पाथरी, मऱ्हेगाव, वाकला, सारख्या गावात पाण्याची टंचाई असणे म्हणजे गावातील अनेक आश्चर्यापैकी एक. तप्त उन्हात, खुल्या आभाळात अचानक वादळवाऱ्यासह पावसाची हजेरी लागत थोड्याफार उष्माकमी होण्याची आस नागरिकांना लागली आहे. शेतकरी मात्र उन्हातान्हाची परवा न करता अंगावरील कमी कपड्यात घामाच्या धारासह खरीब हंगामात व्यस्त दिसत आहे. सध्या हातातील पीक वाचविण्यासाठी बळीराजा पराकोटीचा प्रयत्न करीत आहे. मात्र, त्यांना निसर्गाची साथ लाभत नसल्याचे दिसून येत आहे.