वैनगंगेच्या पाणी पातळीत अचानक वाढ
By Admin | Updated: June 21, 2014 23:50 IST2014-06-21T23:50:19+5:302014-06-21T23:50:19+5:30
नुकत्याच हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात व्यास नदीवरील धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने २४ तरूण वाहून गेले होते. त्या घटनेने संपूर्ण देश स्तब्ध झाला होता. प्रशासन खडबळून जागे झाले.

वैनगंगेच्या पाणी पातळीत अचानक वाढ
तुमसर : नुकत्याच हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात व्यास नदीवरील धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने २४ तरूण वाहून गेले होते. त्या घटनेने संपूर्ण देश स्तब्ध झाला होता. प्रशासन खडबळून जागे झाले. परंतु भंडारा व तुमसर प्रशासनाने या घटनेतून दखल घेतली नाही. दोन दिवसांपूर्वी वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. अचानक पाणी वाढल्याने ती घटना येथे सुदैवाने टळली.
वैनगंगा नदीपात्रात तुमसर तालुक्यातील मांडवी-वाहनी या गावाजवळ राज्य शासन व अदानी समूहाने ४५० कोटींचा संयुक्त प्रकल्प तयार केला आहे. पाणी अडविल्याने भर उन्हाळ्यात नदीपात्रात पलीकडे नदी दोन्ही थडी भरून आहे. अदानी समूह व धापेवाडा सिंचन प्रकल्पाला येथून पाणी मिळते. शेकडो एकर शेती सिंचनाची साये तिरोडा तालुक्यात झाली आहे. नैसर्गिक नदीचा प्रवाह बंद करता येत नाही म्हणून प्रकल्पाच्या दारातून पाणी हळूहळू जाणे सुरू राहते. उन्हाळ्यात प्रकल्पाची संपूर्ण दारे बंद होती. पावसाळा सुरू झाल्याने व मध्य प्रदेशात पाऊस पडत असल्याने वैनगंगेचा जलस्तर वाहनी-मांडवी गावाजवळ वाढला होता. याची माहिती जिल्हा प्रशासनाला प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली.
दोन दिवसापूर्वी वाहनी-मांडवी प्रकल्पाची दारे उघडण्यात आली. पाण्याचा प्रचंड विसर्ग येथून सुरू झाला. नदी काठावरील गावांतील नागरिकांना नदीपात्रात पाण्याचा जलस्तरात अचानक वाढ झाल्याचे आश्चर्य वाटले. वाहनी-मांडवी ते उमरवाडा-बाम्हणी-माडगीचे अंतर केवळ १० ते १२ कि़मी. आहे. नदीपात्रात नदीकाठावरील नागरिक-महिला बैल-म्हशी तथा कपडे धुण्याकरिता जातात. उन्हाळ्यात व पाऊस न पडल्याने सर्व बिनधास्त होते. अचानक पाण्याची वाढ झाल्याने अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. प्रकल्प अधिकाऱ्यांनी पाणी नदीपात्रात विसर्गसंदर्भात जिल्हा प्रशासनाला माहिती दिली होती. जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनाचे प्रमुख होते. तहसीलदार यांना यासंदर्भात कळविले होते. तहसीलदारांनी आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांना माहिती दिली असणारच. परंतु येथे तशी सक्षम यंत्रणा नाही. पाणी विसर्ग करतानी मोठ्या भोंग्याची व्यवस्था नाही, अशी माहिती आहे.
नदी काठावरील प्रत्येक गावात भोंग्याची व्यवस्था नाही. बावनथडी प्रकल्प व वाहनी-मांडवी प्रकल्पाचा प्रत्यक्ष संबंध येणाऱ्या गावातही तशी व्यवस्था नाही हे विशेष. पाणी विसर्ग होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली होती. त्यानंतर तालुका प्रशासनाने नदीकाठच्या गावांना तत्काळ माहिती दिली होती, अशी माहिती तहसीलदार सचिन यादव यांनी लोकमतला दिली. (तालुका प्रतिनिधी)