स्वातंत्र्याचा उदय अनुभवणारी पाथरीची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 06:00 AM2020-02-24T06:00:00+5:302020-02-24T06:00:18+5:30
‘यावे ज्ञानासाठी, निघावे सेवेसाठी’ या म्हणीला सार्थ करीत शेकडो विद्यार्थी या शाळेतून ज्ञान घेवून बाहेर पडले. अनेक विद्यार्थी आजघडीला शासकीय सेवेतही कार्यरत आहेत. पवनीचे गटशिक्षणाधिकारी नरेश टिचकुले, केंद्रप्रमुख बी. आर. मेश्राम यांच्या मार्गदर्शनामुळे येथील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : स्वातंत्र्याचा उदय अनुभवणारी शाळा म्हणून पवनी तालुक्यातील पाथरी स्थित जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक शाळेचे नाव घेतले जाते. गत सात दशकात १८३२ विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या या शाळेने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांच्या विकासावरही लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांचा अनन्यसाधारण वाटा आहे.
जीवनदायीनी वैनगंगा नदीच्या कुशीत वसलेले तथा १०९६ इतकी लोकसंख्या असलेले पाथरी (पुन.) गाव येथे २१ एप्रिल १९४९ रोजी जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक शाळेचे स्थापना करण्यात आली. ज्ञार्नाजनासोबतच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास तसेच अनेक मुल्य रुजवून सक्षम नागरीक बनविण्यावर शिक्षक तथा पालक प्रयत्नरत आहेत.
‘यावे ज्ञानासाठी, निघावे सेवेसाठी’ या म्हणीला सार्थ करीत शेकडो विद्यार्थी या शाळेतून ज्ञान घेवून बाहेर पडले. अनेक विद्यार्थी आजघडीला शासकीय सेवेतही कार्यरत आहेत. पवनीचे गटशिक्षणाधिकारी नरेश टिचकुले, केंद्रप्रमुख बी. आर. मेश्राम यांच्या मार्गदर्शनामुळे येथील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहे. महापुरुषांचे विचार रुजविण्यासोबतच वैयक्तिक स्वच्छता, दिनांकाचा पाढा, सामान्य ज्ञान, म्हणींचा अर्थ विद्यार्थ्यांचे वाढदिवस, शालेय परिसरात परसबाग, बाल आनंद मेळावा, कला प्रदर्शनी, विज्ञान प्रदर्शन, क्षेत्र भेट, स्नेहसंमेलन आदी उपक्रम राबविले जात आहे.
विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ
सत्र २०१९-२० या वर्षात शाळेची पटसंख्या ९३ असून पाच शिक्षक कार्यरत आहेत. यावर्षी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेकरिता शाळेतून चार विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. तसेच सात विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची परीक्षा दिली. नियोजनबध्द विविध उपक्रमासह शाळा राबवित असल्याने विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना संधी मिळत आहे. परिणामी त्यांच्यातील सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी स्वतंत्र असे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यासाठी सर्वांचेच सहकार्य लाभत आहे.
इंग्रजी माध्यमांच्या शाळेचे पेव फुटले असले तरी त्या शाळांमधून गावचे विद्यार्थी परत आले आहे. शैक्षणिक गुणवत्तेवर आमचा भर आहे.
- दिनकर काटेखाये, मुख्याध्यापक
शिस्त व विविध उपक्रम शिक्षकगण राबवित असून ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभत आहे.
- जयश्री रोडगे, सरपंच पाथरी
शिक्षकांनी राबविलेल्या उपक्रमामुळे व कार्यशैलीने विद्यार्थ्यांचे मनोबल वाढले आहे.
- नंदलाल भुरे, अध्यक्ष शाळासमिती