जलस्तराचा वेग धिम्यागतीने
By Admin | Updated: December 2, 2014 22:59 IST2014-12-02T22:59:26+5:302014-12-02T22:59:26+5:30
विदर्भातील महत्वाकांक्षी राष्ट्रीय गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविण्याच्या कामाला एक महिन्यापर्यंत स्थगिती दिल्यानंतर दहा दिवसापासून जलस्तर वाढविण्याचे काम सुरु झाले आहे.

जलस्तराचा वेग धिम्यागतीने
गोसेबुज : विदर्भातील महत्वाकांक्षी राष्ट्रीय गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविण्याच्या कामाला एक महिन्यापर्यंत स्थगिती दिल्यानंतर दहा दिवसापासून जलस्तर वाढविण्याचे काम सुरु झाले आहे. आज मंगळवारला जलस्तर २४०.६०० मीटरवर पोहचला आहे. परंतु या धरणामधील पाण्याचा प्रवाह कमी असल्यामुळे संथगतीने जलस्तर वाढत आहे. दहा दिवसात केवळ दोन से.मी.ने जलस्तर वाढला आहे. त्यामुळे यावर्षी धरणाचा जलस्तर २४२ मीटरपर्यंत वाढविण्याची शक्यता कमी आहे.
दिवाळीच्या पुर्वीपासून गोसीखुर्द धरणामध्ये जलस्तर वाढविण्याचे काम सुरु करण्यात आले. परंतु, धरणाचा जलस्तर २४०.४०० मीटरवर पोहोचताच बुडीत क्षेत्रातील गावात पाणी शिरले होते. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना घरातील साहीत्य काढण्याकरीता अडचणी आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या स्थानांतरणाची समस्या निर्माण झाली होती. अड्याळ जवळील धानाच्या शेतात धरणाचे पाणी शिरल्यामुळे धानपिक बुडू लागले होते. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना नवीन गावठानात जाण्याकरीता सुलभ होण्याच्या दृष्टीने व समोर दिवाळी असल्याने १९ आॅक्टोंबर पासून धरणाचा जलस्तर २४०.४०० मीटर वर स्थिर ठेवून जलस्तर वाढविण्याचे काम थांबविण्यात आले होते. २१ नोव्हेंबर पासून परत जलस्तर वाढवीणे सुरु झाले आहे. पण सध्या पाऊस नसल्यामुळे व वैनगंगा व तिच्या उपनद्यांकडून धरणामध्ये येणारा पाण्याचा प्रवाह फारच कमी आहे. त्यामुळे १० दिवसात केवळ २ से.मी.ने जलस्तर वाढत आहे.
या वर्षी २४२ मीटरपर्यंत जलस्तर वाढवीण्याचे उद्दिष्ट आहे. पण हे काम फारच कठीण आहे. पाऊस वैगेरे आला तरच हे उद्दिष्ट पुर्ण होऊ शकेल. डिसेंबर अखेर पर्यंत वाढले तर वाढले पण त्यानंतर जलस्तर वाढण्याची अजीबात शक्यता नाही.
पाथरी गावातील सर्व प्रकल्पग्रस्तांनी नवीन गाव ठानात स्थलांतर केल्यामुळे या गावाचा प्रश्न सुटला आहे. सावरगावच्या चारही बाजूने पाणी झाले आहे. पण या गावातील सर्व प्रकल्पग्रस्तांनी गाव रिकामे केले आहे.
वडद मधील अनेक घरात पाणी शिरले आहे. २४१ मीटर पर्यंत तरी कोणत्याही गावाला धोका नाही. धोका असणारी गावे अगोदरच रिकामे झाले आहेत. (वार्ताहर)