व्यथा सूर नदीची : नागरिकांची पाण्यासाठी एकच धावपळ
By Admin | Updated: July 14, 2014 00:19 IST2014-07-14T00:19:36+5:302014-07-14T00:19:36+5:30
लहान ओढे, नद्या सोबतच बंधारे कोरडेच आहे. मोहाडीची सूर नदी आटून दीड वर्ष झाली.

व्यथा सूर नदीची : नागरिकांची पाण्यासाठी एकच धावपळ
राजू बांते मोहाडी
लहान ओढे, नद्या सोबतच बंधारे कोरडेच आहे. मोहाडीची सूर नदी आटून दीड वर्ष झाली. सूरनदीत पाणी नसण्याचा फायदा रेती उपसा करणाऱ्यांनी चांगला घेतला. त्यांना दीड महिन्याचा नदीचा कोरडा असलेला पात्र कोट्यावधी कमावून गेला. दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नदीवर अवलंबून असलेली गावेही पावसाची वाट पाहत आहेत.
‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा, पाऊस आला मोठा...’ हे बालगीत आता सर्वांनाच आठवू लागले आहे. कोरडी झाली नदीही आपल्या वेदना मुकाटपणे सहन करीत मोठा पाऊस कधी पडतो याची प्रतीक्षा करीत आहे.
पावसाने कायमची पाठ फिरवली की काय? अशी अवस्था आहे. दररोज नजरा आकाशाकडे वळताहेत. पण, पावसाचा थांगपत्ता नाही. पावसासाठी सारेच कासावीस झाले आहेत. उन्हाळ्यासारखी सदृश्य परिस्थिती आहे. घराघरात थंडी देणारे संयंत्र सुरु आहेत. वातावरणाचा प्रभाव शाळेवरही झाला आहे. शिक्षण विभागाने शाळा सकाळपाळीच्या ठेवण्याच्या सूचना शाळा प्रमुखांना दिल्या आहेत. एकुणच ही परिस्थिती विपरीत झाली आहे. पावसासाठी शेतकरी आपापल्या पद्धतीने आराधना करीत आहे. पण वरूण राजाला दया येत नाही. दररोज सकाळचा दिवस लख्ख प्रकाशाने होतो. अशीच पाऊस न येण्याची परिस्थिती राहिली तर शेतकरी व सामान्याच्या घरात हाहा:कार निर्माण होण्याची शक्यता आहे. जुलैचा पंधरवडा उलटला आहे. महत्वाच्या पावसाची नक्षत्रे निघून गेली आहे. पावसाला मात्र जोर नाही. नाले, नद्या पाण्यासाठी आसूसलेल्या आहेत. नदीच्या पाण्याची भूख कायम आहे. भर पावसाळ्यात नदीच्या पात्रात चटके बसताहेत. नदीचा दाह तसाच आहे. आज सुर नदी सारख्या अनेक नद्या पावसाविना वेदना सहन करीत आहे. या नद्यांची तृष्णा कधी भागते हे निसर्गावर अवलंबून आहे. नद्यांची तहान पाण्याने भागली. नाही तर लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागणार आहे. मोहाडीसाठी खोडगाव, सुरनदी येथून पाणी पुरवठा होतो. नदीच्या पात्रातच पाणी नाही तर लोकांची तहान कशी भागणार ही चिंता आतापासून सुरु झाली आहे. पाण्याची आस पूर्ण झाली तरच पुढचं सर्व काही व्यवस्थित होईल, अशी आस आहे.