स्मशानशेड ठरले निरुपयोगी
By Admin | Updated: June 19, 2014 23:41 IST2014-06-19T23:41:55+5:302014-06-19T23:41:55+5:30
माडगी येथील वैनगंगा नदीघाटावरील स्मशानशेड निरुपयोगी ठरला असून येथे जाण्यास सुरळीत व सुरक्षित रस्ताच नाही. स्टेशनटोली (दे) येथील स्मशानशेड सुमारे दीड वर्षापूर्वी तयार झाला.

स्मशानशेड ठरले निरुपयोगी
योजनेचा फज्जा : रस्ता नसलेल्या ठिकाणी बांधकाम
तुमसर : माडगी येथील वैनगंगा नदीघाटावरील स्मशानशेड निरुपयोगी ठरला असून येथे जाण्यास सुरळीत व सुरक्षित रस्ताच नाही. स्टेशनटोली (दे) येथील स्मशानशेड सुमारे दीड वर्षापूर्वी तयार झाला. परंतु येथे आजपर्यंत कुणीच दाहसंस्कार केले नाही.
तुमसर शहर तथा देव्हाडी परिसरातील नागरिक अंतीम संस्काराकरिता माडगी येथील वैनगंगा काठावर मोठ्या प्रमाणात येतात. येथे स्मशानशेडची व्यवस्था मागील दोन वर्षापर्यंत नव्हती. जिल्हा प्रशासनाने नंतर येथे स्मशानशेड मंजूर केले. नदी काठावर सुमारे ५ ते ६ लाख किंमतीचे सिमेंटचे स्मशानशेड तयार केले. परंतु येथे पावसाळ्यात जाण्यास सुरळीत व सुरक्षित रस्ताच नाही. नदीचे पाट येथे अगदी स्मशानशेडच्या बाजूला पडले आहे. त्यामुळे हा स्मशानशेड केव्हाही वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्मशानशेड नंतर हा पाट पडला असे सांगण्यात येते.
लाकडे घेऊन येणारा ट्रॅक्टर, बैलबंडी येथे पावसाळ्यात जाऊ शकत नाही. हे स्थळ धोकादायक स्थळात आहे. बाजूलाच कोळीब ांधवांची सुमारे २५ ते ३० घरे आहेत. स्मशानशेड व घरे एकमेकास समांतर असल्याने लहान मुले व महिलांना भीती वाटते. ज्या उद्देशाकरिता हे स्मशान शेड तयार करण्यात आले तो उद्देशच येथे पूर्ण झाला नाही. येथे कंत्राटदाराचे हित जोपासले गेले आहे.
स्टेशनटोली (दे) येथे मुंबई हावडा रेल्वे मार्गाच्या शेजारी स्मशानशेड तयार करण्यात आले आहे. एक ते दीड वर्षापूर्वी ते तयार झाले. येथे आजपर्यंत एकही अंतीम संस्कार करण्यात आले नाही. पावसाळ्यात या स्मशानशेडकडे जाताच येत नाही. नाल्याच्या पलीकडे हे स्मशानशेड आहे. ऐरवी उन्हाळ्यात व हिवाळ्यातसुद्धा येथे कुणीच जात नाही. हा स्मशानशेड सुद्धा निरुपयोगी ठरला आहे. गाव तिथे स्मशानशेड ही शासनाची योजना राबविण्याकरिताच शासनाच्या पैशाचा अपव्यय होत आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात गंभीर दखल घेण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)