शटल रेल्वे; जनभावनेचा आदर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:01 IST2020-08-25T05:00:00+5:302020-08-25T05:01:05+5:30
भंडारा शहरवासीयांसाठी अत्यंत ज्वलंत विषय असलेला शटल रेल्वेबाबतच्या निर्णयावर सर्वजण उत्सुक आहेत. मात्र जुना आदेश समोर करीत भंडारा रोड पर्यंतच्या रेल्वे लाईन काढण्याचे कार्य सुरू आहे. काम सुरू होताच जनभावना उफाळून आले. त्यामुळे रेल्वे लाईनच्या नवीनीकरणाची योजना बनत नाही, तोपर्यंत रेल्वे लाईन यथास्थिती ठेवण्यात यावी, या आशयाचा प्रस्ताव सर्वदलीय बैठकीत एकमताने पारित करण्यात आला.

शटल रेल्वे; जनभावनेचा आदर करा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा शहर ते भंडारा रोड (वरठी) पर्यंत विस्तारित असलेल्या रेल्वे लाईन काढण्याचे काम थांबविण्यात यावे. तसेच शहरातील शटल रेल्वेच्या प्रस्ताव शासनाकडे सादर करून जनभावनेचा आदर करावा, अशी मागणी सर्वदलीय समितीच्या बैठकीत एकमताने करण्यात आली
भंडारा शहरवासीयांसाठी अत्यंत ज्वलंत विषय असलेला शटल रेल्वेबाबतच्या निर्णयावर सर्वजण उत्सुक आहेत. मात्र जुना आदेश समोर करीत भंडारा रोड पर्यंतच्या रेल्वे लाईन काढण्याचे कार्य सुरू आहे. काम सुरू होताच जनभावना उफाळून आले. त्यामुळे रेल्वे लाईनच्या नवीनीकरणाची योजना बनत नाही, तोपर्यंत रेल्वे लाईन यथास्थिती ठेवण्यात यावी, या आशयाचा प्रस्ताव सर्वदलीय बैठकीत एकमताने पारित करण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार मधुकर कुकडे होते. याप्रसंगी खासदार तथा नगराध्यक्ष सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, भंडारा रेल्वे समितीचे अध्यक्ष प्रेमराज मोहोकर, सचिव रमेश सुपारे, ड्रामा संघटनेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
रेलयात्री समितीच्या बैठकीत समितीच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्वच पक्षाचे तसेच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. या बैठकीत सामूहिक मागणी करण्यात आली की, रेल्वे लाईन दुरवस्थेत आहे, परिणामी त्या रुळावरून रेल्वे धावणे अशक्य आहे. परंतु सदर रेल्वेलाईन काढून त्या ठिकाणी वृक्षारोपण करणेही उचित नाही, असे झाल्यास भविष्यात रेल्वे विकासाची संभावना शून्य व मोडीत काढली जाईल. यावेळी रेल्वे समितीचे सचिव रमेश सुपारे यांनी राजीव गांधी चौक येथून शटल ट्रेन व रॅक पॉर्इंटची शक्यता, यादृष्टीने तीन वेळा तांत्रिक तपासणी करण्यात आल्याचे सांगितले. परंतु राजकीय इच्छाशक्तीअभावी काम होऊ शकले नाही. ड्रामा रेल्वे संघटनेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल म्हणाले, भंडारा शहरातून एकदा रेल्वे लाईन काढणे म्हणजे शटल रेल्वेबाबत उदासीनता दाखविणे आहे. आमदार कारेमोरे म्हणाले, जनतेला विश्वासात न घेता रेल्वे लाईन काढणे चुकीचे आहे. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष प्रेमराज मोहोकर, विनोद भोयर, प्रवीण उदापुरे यांनीही विचार व्यक्त केले. आमदार भोंडेकर यांनी कार्यकर्त्यांसह रेल्वे लाईन काढण्याचे काम थांबवले होते. यासंदर्भात जनतेत तीव्र आक्रोश आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने जनभावना लक्षात घ्यावी, असे एकमताने ठरविण्यात आले. रेल्वे लाईनमुळे भविष्यात विकासाची अपेक्षा असून पुढची पिढी आपल्याला क्षमा करणार नाही असेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
खा. मेंढे म्हणाले, आपण जनभावनासोबत असून यासंबंधीची माहिती रेल्वेमंत्र्यांना पत्राद्वारे अवगत करण्यात येईल. तसेच सर्वदलीय शिष्टमंडळासोबत रेल्वे मंत्रालय व अधिकाऱ्यांना भेटण्याचीही यावेळी ठरविण्यात आले. जवाहरनगर ते वरठी रेल्वे लाईन काढण्याचे काम थांबविण्यासाठी सर्वदलीय रेल विकास मंचचे अध्यक्ष म्हणून माजी खासदार मधुकर कुकडे याची सर्वसंमतीने अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच संसद व विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करावा, अशी आग्रही भूमिकाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
बैठकीत वरीयलदास खानवानी, सुरेश फुलसुंगे, बाबा बाच्छील, चंद्रकांत शहारे, विकास मदनकर, संजय मते, बबन मेश्राम, हेमंत चंदावसकर, उमराव सेलोकर, संतोष राजगिरे, रोशन येरणे, अजय मेश्राम, सुरेश कोटगले, प्रतीक तांबोळी, मयूर बिसने, राजेंद्र उके, नितीन धकाते, जैकी रावलानी, भगवान झंझाड, देविदास लांजेवार, लोकेश खोब्रागडे, विनोद भुरे, मनीष शिरसागर, अशोक वघरे, भाऊराव बन्सोड, हेमंत महाकाळकर आदी उपस्थित होते.
समिती पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
सर्वदलीय बैठकीनंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याशी भेट घेत यासंदर्भात चर्चा केली. चर्चेत रेल्वेबाबत भंडारा जिल्ह्यासह शहरवासीयांची जनभावना तीव्र आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रेल्वे लाईन काढण्याचे काम तत्काळ थांबविण्याची मागणीही रेल्वे समितीच्या वतीने याप्रसंगी जिल्हाधिकाºयांना करण्यात आली.