धक्कादायक, हा रस्ता आहे की मृत्यूमार्ग ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:00 IST2020-09-10T05:00:00+5:302020-09-10T05:00:11+5:30
जीवनदायीनी वैनगंगा रेंगेपार गावाला खेटून येथे वाहत आहे. मागील दहा वर्षात नदीच्या प्रवाह झपाट्याने गावाच्या दिशेने येत आहे. सध्या रस्ता व नदीकाठचे अंतर केवळ अर्ध्या वा एका फुटावर आले आहे. तरीही रस्त्यावरून वाहतूक सुरूच आहे. नदी काठावरून वाहतूक अतिशय धोकादायक असताना जीव धोक्यात घालून येथे वाहतूक सुरू आहे.

धक्कादायक, हा रस्ता आहे की मृत्यूमार्ग ?
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर तालुक्यातील वैनगंगा नदी काठावर वसलेल्या रेंगेपार गावाशेजारून वैनगंगा नदी वाहते. नदी काठाशेजारूनच रस्ता आहे. रस्ता व नदीचे काठ यांचे अंतर केवळ अर्धा ते एक फुटावर आहे. पलीकडे नदीची दरी आहे. रस्त्यावरून जाताना हा रस्ता आहे की मृत्यू मार्ग असा प्रश्न येथे पडतो. प्रशासनाची अनास्था व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष येथे अपघाताची प्रतीक्षा तर बघत नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे.
जीवनदायीनी वैनगंगा रेंगेपार गावाला खेटून येथे वाहत आहे. मागील दहा वर्षात नदीच्या प्रवाह झपाट्याने गावाच्या दिशेने येत आहे. सध्या रस्ता व नदीकाठचे अंतर केवळ अर्ध्या वा एका फुटावर आले आहे. तरीही रस्त्यावरून वाहतूक सुरूच आहे.
नदी काठावरून वाहतूक अतिशय धोकादायक असताना जीव धोक्यात घालून येथे वाहतूक सुरू आहे. वरिष्ठ लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे कायम दुर्लक्ष होत आहे. अपघातानंतर येथे प्रशासनाला जाग येईल कय, असा प्रश्न पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी केला आहे. निधीकरिता दहा वर्षे येथे प्रतीक्षा करावी लागत आहे, ही शोकांतिका आहे.
महापुरात धोक्याची होती शक्यता
४वैनगंगेला यावर्षी महापूर आला. रेंगेपार येथे नदीचे पात्र विस्तीर्ण आहे. वैनगंगेचा प्रवाह वेगाने वाहत असताना रस्ताच नदी पात्रात समावेश होतो का, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता. परंतु पूरात रस्ता शाबूत राहिला. रस्त्यावरून जाताना येथे भीती वाटते. रस्ता अतिशय उंच असून नदीपात्रात डोकावले तर दरीचा भास होतो.
बस वाहतूक बंद
तुमसर आगाराने या मार्गावरील बस वाहतूक मागील वर्षभरापासून बंद केली आहे. येथे रस्ता निमुळता व धोकादायक असल्याने तसा निर्णय एसटी महामंडळाने घेतला.
बायपास रस्ता नाही
रेेंगेपार गावाला बायपास रस्त्याची मागणी जूनी आहे. परंतु निधीच्याअभावी बायपास रस्त्यांचे बांधकाम झाले नाही. ग्रामस्थांनी अनेकदा निवेदने येथे प्रशासनास व लोकप्रतिनिधींना दिली आहेत, परंतु त्याचा उपयोग झाला नाही.
अपघातानंतर जाग येणार काय?