४८ तासात सात अर्भकांचा मृत्यू!
By Admin | Updated: October 4, 2014 23:21 IST2014-10-04T23:21:08+5:302014-10-04T23:21:08+5:30
गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळखले जाणाऱ्या जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारादरम्यान मागील ४८ तासात सात अर्भकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

४८ तासात सात अर्भकांचा मृत्यू!
सामान्य रूग्णालयातील प्रकार : रूग्णालयाकडून प्रकरणावर पडदा
भंडारा : गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळखले जाणाऱ्या जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारादरम्यान मागील ४८ तासात सात अर्भकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
हलाखीच्या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक गरीब रूग्ण शासकीय रूग्णालयात औषधोपचार घेतात. त्यातील अनेकांवर स्थानिक शासकीय रूग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यास त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात रेफर केले जात आहे.
मागील ४८ तासांपूर्वी जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी ग्रामीण भागातून आलेल्या काही गर्भवतींनी बाळांना जन्म दिला. त्यानंतर त्यातील काही अर्भकांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून औषधोपचार करण्यात आले. तर काही रेफर टू भंडारा करण्यात आलेल्या नवजात बालकांवर उपचार करण्यात आले.
मागील ४८ तासात जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या अर्भकांपैकी सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. यातील काही बालक वॉर्ड क्रमांक १०, ११ मधील तर काही अर्भक १२ मधील होते. याबाबत सामान्य रूग्यालयात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता येथील परिचारीकांनी बालकांचा मृत्यू हा रोजच होत असून रूग्णालयासाठी हा नविन प्रकार नसल्याचे सांगून या गंभीर विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला. प्रकरणातील सत्यता बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता रूग्णालय प्रशासनाकडून या प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
प्रकरणाची सत्यता बाहेर आल्यास रूग्णालयाचे पितळ उघडे पडण्याची भिती निर्माण झाल्याने माहिती दडवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याची सुश्रूशा करण्याचे एकमेव केंद्र म्हणून जिल्हा सामान्य रूग्णालयाकडे बघितले जाते.
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र, उपजिल्हा रूग्णालय, सामान्य रूग्णालय व उपकेंद्रात नागरिकांवर शासनाकडून मोफत आरोग्य सुविधा पुरविल्या जात आहे. आरोग्य साहित्य व औषधांच्या साठ्याचा पुरवठा अनियमित होत असल्याने रूग्णांचे बेहाल होत आहे. त्यामुळे अनेक रूग्ण शासकीय दवाखान्याऐवजी खासगी रूग्णालयाकडे धाव घेत आहेत. (शहर प्रतिनिधी)