शाळेची घंटा वाजली, पण विद्यार्थी आलेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:01 IST2020-06-27T05:00:00+5:302020-06-27T05:01:14+5:30
दरवर्षी राजश्री शाहू महाराज जयंतीच्या दिवशी शाळेच्या नवीन शैक्षणिक सत्राला प्रारंभ होते. मात्र यंदा कोरोनाच्या संकटाने शाळा कधी सुरू होणार याची अनिश्चितता होती. मात्र शिक्षण विभागाने गतवर्षी केलेल्या नियोजनानुसार गुरूवार २६ जून रोजी शाळा झाल्या. परंतु शाळेत विद्यार्थीच नव्हते. २३ मार्चपासून बंद असलेल्या शाळेत शिक्षकांची उपस्थिती मात्र दिसून आली.

शाळेची घंटा वाजली, पण विद्यार्थी आलेच नाही
राजू बांते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : शाळेचा पहिला दिवस म्हटला की उत्साह आणि उत्सुकता. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग. घंटा वाजताच शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट. मात्र यंदा कोरोनाच्या महासंकटात शाळेची घंटा वाजली. परंतु विद्यार्थीच आले नाही. शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्याविना शाळा सुरू झाल्या. इतिहासात कधीही अशा पद्धतीने शाळा सुरू झाली नसावी.
दरवर्षी राजश्री शाहू महाराज जयंतीच्या दिवशी शाळेच्या नवीन शैक्षणिक सत्राला प्रारंभ होते. मात्र यंदा कोरोनाच्या संकटाने शाळा कधी सुरू होणार याची अनिश्चितता होती. मात्र शिक्षण विभागाने गतवर्षी केलेल्या नियोजनानुसार गुरूवार २६ जून रोजी शाळा झाल्या. परंतु शाळेत विद्यार्थीच नव्हते. २३ मार्चपासून बंद असलेल्या शाळेत शिक्षकांची उपस्थिती मात्र दिसून आली. गुरूवारी शिक्षक शाळेत दाखल झाल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र होते. पण विद्यार्थी नाही, असा विचित्र अनुभव पहिल्यांदाच शिक्षकांना आला.
कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. त्याचा थेट प्रभाव जनजीवनावर झाला आहे. गुरूवारी सर्वप्रथम माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकांच्या उपस्थित सुरू झाल्या. मात्र मुलांची किलबिल ऐकायला मिळाले नाही. आता शाळा सुरू कराव्यात यावर मोठे मंथन झाले. अखेर राज्य शासनाने १५ जून रोजी निर्णय घेतला. शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात यावे, असे आदेश दिले. शाळेत मुलांना बोलावायचे की नाही याचा अंतिम निर्णय शाळा व्यवस्थापन समितीला दिला. त्यानंतर शिक्षक विभागाने शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे निर्देश दिले आणि आज विद्यार्थ्याविना शाळा सुरू झाली. शाळांच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार अनुभवायला आला. विद्यार्थी गत तीन महिन्यांपासून शाळेत जाण्यासाठी उत्सूक आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे शाळांऐवजी घरी बसूनच आॅनलाईन अभ्यास करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
शाळा बंद शिक्षण सुरू
कोरोना संसर्गामुळे शाळा बंद पण शिक्षण सुरू असा ऑनलाईन उपक्रम राज्यस्तरावर राबविला गेला. शाळेत मुले आली नाहीत. मात्र त्यांना डिजिटल शिक्षण, दूरदर्शनच्या वाहिन्यावरून मार्गदर्शन दिक्षा अॅप आदीद्वारे शिक्षण विद्यार्थ्यांनापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. भंडारा जिल्ह्यातील अनेक शाळा यात सहभागी झाल्या होत्या.
शाळेत आज विद्यार्थ्यांना यायचे नव्हते. किती शिक्षक शाळेत नवीन सत्राच्या दिवशी उपस्थित झाले, याची माहिती घेण्यात येत आहे.
-विनोद चरपे, गटशिक्षणाधिकारी, मोहाडी.