समीर व वंशच्या भेटीला येतात पक्षी
By Admin | Updated: May 15, 2016 00:19 IST2016-05-15T00:19:49+5:302016-05-15T00:19:49+5:30
धावपळीच्या युगात आज माणूस माणसापासून दुरावला आहे.

समीर व वंशच्या भेटीला येतात पक्षी
झाडावर पक्ष्यांसाठी पाणपोई
भंडारा : धावपळीच्या युगात आज माणूस माणसापासून दुरावला आहे. त्यात प्राणी पक्ष्यांचे तर दूरच. परंतु, खात रोडवरील खोकरला ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सुर्यकेतू नगर येथील पक्षीमित्र भावंडांना पशुपक्ष्यांशी लळा लागला.
उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता त्यांनी घराच्या अंगणातील सदाफुलीच्या झाडावर पक्षांसाठी खाणावळ आणि पाणपोईची व्यवस्था केली. त्यामुळे दैनंदिनी त्यांच्या भेटीला अनेक पक्षी येऊ लागले आहे. त्यांच्या प्रतीक्षेत दोघेही भावंड असतात. दोघांनीही उपक्रमातून पक्षी वाचवा हा संदेश दिला आहे.
समीर आणि वंश राजू आगलावे अशी पक्षीमित्र भावंडाची नावे आहे. समीर नववीचा तर वंश पाचवीचा विद्यार्थी आहे. दोघांनाही पशुपक्ष्यांशी लळा आहे. शिक्षक व आईवडीलांच्या मार्गदर्शनात उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता त्यांनी पक्ष्यांकरिता पाणी पिण्यासाठी पाणपोई व खाण्यासाठी खाणावळ म्हणून घराच्या अंगणात असणाऱ्या सदाफुलीच्या झाडाला पक्षीपात्र व इतर मातीचे भांडे बांधून पक्ष्यांसाठी सोय केली. दोघेही भावंड हे शिजलेले अन्न, पाणी त्या भांड्यामध्ये ठेवत असतात. पक्ष्यांनाही आता भावंडांच्या घराची सवय लागली आहे. दैनंदिनी दोघेही भावंड पक्ष्यांची वाट बघत असतात.
अनेक पक्षी त्यांचेकडे येवून खाद्य व पाणी पिवून तृप्त होतात. त्यांंच्या या उपक्रमाचे सर्वच कौतुक करीत आहेत. पशुपक्षी निसर्गाचे महत्वाचे घटक आहे ते वाचले तरच पर्यावरण संतुलित राहील. पक्ष्यांना वाचविण्यासाठी आम्ही अशा प्रकारे पाणपोई आणि खाणावळ सुरू केली. या माध्यमातून पक्ष्यांना वाचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येकाने पक्ष्याबद्दल कळवळा दाखविला तर पक्ष्यांचे जीव आणि पर्यावरणही वाचेल असा विचार हे दोन्ही पक्षीमित्र भावंड करतात. या उपक्रमासाठी आईवडिल व शिक्षकांकडून प्रेरणा मिळाल्याचे ते सांगतात. (शहर प्रतिनिधी)